- लोकसंख्या, उद्योग वाढले; रस्ते, पाणी, क्रीडांगण आणि वाहतूक समस्या सुटेनात..
- प्रभागातील सत्तर हजार मतदार देणार का विकासाला मत?…
न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ डिसेंबर २०२५):- १९९७ साली पिंपरी-चिंचवड महापालिकेत समाविष्ट झालेल्या चिखली गावाच्या अर्ध्या भागातून तयार झालेला प्रभाग क्रमांक १ आज शहरातील महत्त्वाचा, मात्र विकासाच्या बाबतीत दुर्लक्षित प्रभाग ठरत असल्याचे चित्र आहे. कामगार वस्ती, गावठाण परिसर आणि वाढत्या उच्चभ्रू सोसायट्यांमुळे या प्रभागाचा विस्तार झपाट्याने झाला; पण त्याच गतीने मूलभूत नागरी सुविधा उभ्या राहिल्या नसल्याची नागरिकांची ठाम तक्रार आहे.
चिखली गावठाण, पाटीलनगर, सोनवणे वस्ती आणि मोरे वस्तीचा समावेश असलेल्या या प्रभागात कामगारवर्गासोबतच लघुउद्योगांची संख्या मोठी आहे. गेल्या तीन दशकांत लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढली; मात्र डीपी रस्त्यांचे जाळे, अंतर्गत दर्जेदार रस्ते, आरक्षणांचा विकास, क्रीडांगणे आणि उद्याने या बाबतीत प्रभाग मागे राहिला आहे. गुणवंत खेळाडू असूनही सुसज्ज मैदान नसल्याने युवकांमध्ये नाराजी आहे.
अपुरा व दूषित पाणीपुरवठा, सांडपाणी व पावसाळी वाहिन्यांचा अभाव, वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा, वाढती गुन्हेगारी आणि रेडझोनची टांगती तलवार या समस्या नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम करत आहेत. देहू–आळंदी मार्गावरील अतिक्रमणे व वाहतूककोंडी, चिखली-साने चौक तसेच साने चौक–शिवरकर चौक रस्त्यांचे रखडलेले रुंदीकरण यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. छोट्या उद्योग परिसरातील रस्त्यांची दुरवस्था हा स्वतंत्र गंभीर प्रश्न ठरतो.
काही सकारात्मक बाबीही प्रभागात दिसून येतात. भामा आसखेड पाणीपुरवठा योजनेंतर्गत जलशुद्धीकरण केंद्र आणि जलवाहिन्यांची कामे, संतपीठ व टाऊन हॉलची निर्मिती, तसेच पीएमपी बस सेवा सुरू झाल्याने दळणवळणाला चालना मिळाली आहे. नेवाळे वस्ती ते तळवडे डीपी रस्ता पूर्ण झाल्याने काही प्रमाणात वाहतूक सुरळीत झाली आहे. मात्र, ही कामे अपुरी असून उर्वरित प्रलंबित प्रकल्प तातडीने पूर्ण करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
नागरिकांकडून प्रलंबित डीपी रस्ते, दर्जेदार अंतर्गत रस्ते व पथदिवे, नियमित कचरा संकलन, आरोग्य केंद्रे व शाळा, वाहतूककोंडीमुक्त रस्ते, अखंडित वीजपुरवठा, ड्रेनेजचे पाणी सोसायट्यांत शिरू नये यासाठी उपाययोजना, तसेच ज्येष्ठांसाठी विरंगुळा केंद्रांची मागणी केली जात आहे.
चार सदस्यीय प्रभाग रचनेत मागास प्रवर्ग, महिला व सर्वसाधारण आरक्षण असलेल्या या प्रभागात सुमारे सत्तर हजारांच्या आसपास मतदारसंख्या आहे. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक १ मधील विकास प्रलंबित प्रश्न हेच प्रचाराचे केंद्रबिंदू ठरण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत.












