न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. ३१ जुलै २०२६) :- निगडी गावठाण येथील मारुती मंदिर ते यमुनानगर बोल्हाई माता मंदिर या मार्गावर शालेय विद्यार्थिनींची छेडछाड, वाहनांद्वारे दहशत निर्माण करणे तसेच भरधाव वाहन चालवून विद्यार्थिनींच्या अंगावर वाहन घालण्याचा प्रयत्न होत असल्याच्या तक्रारी वाढत असल्याचा आरोप भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते सचिन काळभोर यांनी केला आहे.
या संदर्भात त्यांनी निगडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बनसोडे यांना निवेदन देऊन संबंधित मार्गावर तातडीने पोलीस गस्त वाढविण्याची मागणी केली आहे.
निवेदनानुसार, प्रसन्नपुरम बिल्डिंग कॉर्नर ते यमुनानगर कॉर्नर या परिसरातून माता अमृतानंदी शाळा, मॉडर्न शाळा आणि एस.पी.एम. शाळा येथे जाणाऱ्या विद्यार्थिनींची मोठ्या प्रमाणावर ये-जा असते. या मार्गावर काही दुचाकी व चारचाकी वाहनचालक मोठ्याने हॉर्न वाजवणे, भरधाव वेगाने वाहन चालवणे, विद्यार्थिनींच्या अंगावर वाहन घालण्याचा प्रयत्न करणे तसेच त्यांना घाबरविण्याचे प्रकार करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या घटनांमुळे विद्यार्थिनींमध्ये तसेच पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, शालेय वेळेत या परिसरात दामिनी पथकाची नियमित गस्त, पोलीस बंदोबस्त तसेच संशयित वाहनचालकांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
सचिन काळभोर यांनी सांगितले की, विद्यार्थिनींची सुरक्षितता ही प्रशासनाची सर्वोच्च जबाबदारी असून या तक्रारींची तातडीने दखल घेऊन प्रभावी उपाययोजना कराव्यात. संबंधित भागात सीसीटीव्हीच्या आधारे देखरेख वाढवून रोड रोमिओ आणि वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशीही मागणी त्यांनी केली आहे.


















