- केंद्र सरकारच्या विरोधात शहर कॉंग्रेसचे गुरुवारी निदर्शने
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ६ नोव्हेंबर २०१९) :- पाच वर्षे होऊन गेली तरी देशाची अर्थव्यवस्था सुरळीत करण्यास केंद्रातील भाजपचे सरकार पुर्णत: अपयशी ठरले आहे. सरकारचे हे अपयश नागरिकांपुढे मांडण्यासाठी देशभर ५ ते १५ नोव्हेंबर या कालावधीत कॉंग्रेस कार्यकर्ते निदर्शने करणार आहेत. त्याअंतर्गत पिंपरी चिंचवड शहर जिल्हा कॉंग्रेसचे कार्यकर्ते गुरुवारी (दि. ७ नोव्हेंबर) सकाळी १० वाजता पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात केंद्र सरकार विरोधात निदर्शने करणार आहेत. अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे प्रवक्ते रत्नाकर महाजन यांनी दिली.
पिंपरी चिंचवड शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटीच्या वतीने पिंपरी येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत महाजन बोलत होते. यावेळी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे, माजी महापौर कविचंद भाट, सेवादलाचे राष्ट्रीय पदाधिकारी संग्राम तावडे, प्रदेश कॉंग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाचे कार्याध्यक्ष गौतम आरकडे, प्रदेश अल्पसंख्यांक सेलचे उपाध्यक्ष राजेंद्रसिंह वालिया, युवक कॉंग्रेस प्रदेश सरचिटणीस मयुर जयस्वाल, अल्पसंख्यांक सेलचे शहराध्यक्ष शहाबुद्दीन शेख, सेवादलाचे शहराध्यक्ष मकरध्वज यादव, विद्यार्थी कॉंग्रेसचे माजी शहराध्यक्ष विशाल कसबे आदी उपस्थित होते.
महाजन यावेळी म्हणाले की, ”२०१४ च्या लोकसभा निवडणूकीत ‘बस हो गई महंगाई कि मार, अब कि बार मोदी सरकार’ अशा घोषणा देणारे भाजपवाले मागील पाच वर्षात वाढलेल्या महागाई विषयी गप्प का? मागील पाच वर्षात एकाही वस्तूचा दर कमी न होता महागाई वाढतच आहे. कमी झालेला जीडीपी दर खोटी आकडेवारी सांगून वाढवून सांगितली जात आहे. जीडीपीचे निकष केंद्र सरकारने बदलून टाकले आहे. चूकीची व खोटी आकडेवारी दाखवून तीन टक्के असणारा जीडीपी पाच टक्के सांगितला जात आहे. कॉंग्रेसनेच राबविलेल्या अनेक योजना नाव बदलून सादर केल्या जात आहेत. त्यातही मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला जात आहे. ‘प्रधानमंत्री फसल बिमा योजनामध्ये’ राफेलमधील भ्रष्टाचारापेक्षा जास्त भ्रष्टाचार झाला आहे. या योजनेतून बीड मधील आठ लाख शेतक-यांना नुकसान भरपाईपोटी अवघे तीस ते चाळीस टक्के रक्कम नुकसान भरपाईपोटी मिळाली आहे. महाराष्ट्रातील नागरिक पूर आणि महागाईशी लढत असताना राज्य सरकारच्या मंत्र्यांना पाहणी करायला आठ दहा दिवसांनी वेळ मिळाला. मंत्री सदाभाऊ खोत यांनी तर फोटो व्हिडीओसाठी पुरग्रस्त भागाचा पाहणी दौरा केला व पर्यटनाचा आनंद लुटला”, अशीही टिका महाजन यांनी यावेळी केली.














