न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ मे. २०२०) :- राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोमवारी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतल्यानंतर मातोश्रीवर जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्याने वेगवेगळे तर्क-वितर्क लढवले जात आहेत. भाजपा नेते नारायण राणे यांनी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली असून सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न सुरु असल्याचा आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे. मात्र शरद पवार यांनी स्वत: सध्याच्या परिस्थितीवर भाष्य केलं आहे.
शरद पवार यांनी एनडीटीव्हीशी बोलताना सरकार स्थिर असून बैठकीच्या माध्यमातून कोणताही संकेत दिला जात नाही असं सांगितलं आहे. “राज्यपालांची भेट घेतली यामध्ये आश्चर्य वाटण्यासारखं काही नाही. त्यांनी दोन वेळा चहाचं निमंत्रण दिलं होतं. महाविकास आघाडी सरकारमध्ये राहण्यास आपण कटिबद्ध आहोत,” असंही त्यांनी सांगितलं आहे.
“महाराष्ट्र सरकारला कोणताही धोका नाही. सर्व आमदार आमच्यासोबत आहेत. जर सध्याच्या परिस्थितीत आमदारांना फोडण्याचा प्रयत्न झाला तर जनता माफ करणार नाही,” असं शरद पवार यांनी सांगितलं आहे. देवेंद्र फडणवीस उगाच उतावीळ होत असल्याचंही शरद पवार यांनी म्हटलं आहे. शरद पवार यांनी सोमवारी राज्यपालांची भेट घेतल्यानंतर मातोश्रीवर जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचीही भेट घेतली. शिवसेना खासदार संजय राऊतदेखील बैठकीला उपस्थित होते.