न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ जून २०२०) :- शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. अशा स्थितीत महापालिका प्रशासनाने हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शहराच्या विविध भागात क्वारंटाईन सेंटर उभारले आहेत. मात्र हे क्वारंटाईन सेंटर म्हणजे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढविणारे सेंटर बनले आहेत. या क्वारंटाईन सेंटर्समध्ये कोरोना झालेल्या रुग्णांच्या संपर्कातील त्यांचे कुटुंबिय, नातेवाईक आणि नागरिकांना ठेवण्यात येत आहे. परंतु, अनेक सेंटर्समध्ये तपासणी न करताच कोरोना निगेटिव्ह असलेल्या नागरिकांना सुद्धा क्वारंटाईन करण्यात आले आहे.
त्याचप्रमाणे याच क्वारंटाईन सेंटर्समध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचीही राहण्याची सोय करण्यात आली आहे. त्यामुळे त्यांच्या संपर्कात येऊन निगेटिव्ह असणाऱ्या क्वारंटाईन नागरिकांना पॉझिटिव्ह बनविले जात आहे. हे फार धक्कादायक आहे. या क्वारंटाईन सेंटरच्या ठिकाणी वैद्यकीय कर्मचाऱ्यांऐवजी पीएमपीएमएलचे वाहक आणि चालकांची नियुक्ती करण्यात आली आहे. वैद्यकीय कर्मचारी नसल्यामुळे क्वारंटाईन सेंटरमधील नागरिकांना योग्य वैद्यकीय उपचार मिळत नाहीत. हे फार भयानक आहे. प्रशासनाचा हा सावळागोंधळ शहराच्या मुळावर येण्यास वेळ लागणार नाही. त्याचप्रमाणे क्वारंटाईन सेंटर्समध्ये ठेवलेल्या नागरिकांना सोयी-सुविधा पुरविल्या जात नाहीत. त्यांना वेळेत जेवण व नाष्टा दिला जात नाही. तसेच दिलेले जेवण आणि नाष्टा निकृष्ट दर्जाचे असते.
त्यामुळे मोशी येथील क्वारंटाईन सेंटरमध्ये ठेवलेल्या नागरिकांनी सेंटरचे गेट तोडून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरात तयार केलेले क्वारंटाईन सेंटर्स महापालिका प्रशासनासाठी भ्रष्टाचार करण्याचे कुरण बनले आहेत. कोट्यवधी रुपये खर्च करूनही क्वारंटाईन केलेल्या नागरिकांना सोयी-सुविधा मिळत नाहीत. त्यामुळे भ्रष्टाचार आणि प्रशासनाच्या चुकांमुळे कोरोनाचा होणारा प्रादुर्भाव रोखण्यासाठी क्वारंटाईन सेंटर्स बंद करून संबंधित नागरिकांना घरातच क्वारंटाईन करण्यात यावे, अशी मागणी अलमदद सामाजिक संस्थेचे संस्थापक, अध्यक्ष अजिज मोहमद शेख यांनी महापालिका आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे.