न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. 23. जून. 2020) :- लोकसभेत सर्वाधिक प्रश्न विचारणाऱ्या पाच खासदारांमध्ये पहिल्या तीन क्रमांकावरचे खासदार हे महाराष्ट्रातील आहेत.
२१२ प्रश्न विचारणाऱ्या बारामतीच्या सुप्रिया सुळे प्रथम क्रमांकावर असून त्यांच्यापाठोपाठ धुळ्याचे सुभाष भामरे आणि शिरूरचे डॉ. अमोल कोल्हे यांनी प्रत्येकी २०२ प्रश्न विचारले आहेत.
पुण्यातील परिवर्तन संस्थेने पहिल्या वर्षीच्या खासदारांच्या कामकाजाचा अहवाल जाहीर करताना ३१ मेपर्यंतच्या कामाची दखल घेतली आहे, अशी माहिती संस्थेच्या अध्यक्षा अंकिता अभ्यंकर, समन्वयक तन्मय कानिटकर आणि सायली दोडके यांनी सोमवारी ऑनलाइन पत्रकार परिषदेत दिली. हा अहवाल khasdar.info या संकेतस्थळावर पाहण्यासाठी उपलब्ध आहे.
लोकसभेत सर्वाधिक प्रश्न विचारणाऱ्या महाराष्ट्रातील खासदारांमध्ये सुळे, भामरे आणि डॉ. कोल्हे यांच्यासह श्रीरंग बारणे (मावळ) आणि गजानन कीर्तिकर (उत्तर-पश्चिम मुंबई) यांचा समावेश आहे.
लोकसभेत सर्वाधिक चर्चामध्ये सहभाग घेणाऱ्या राज्यातील पाच खासदारांमध्ये सुळे आणि बारणे यांच्यासह राहुल शेवाळे (दक्षिण मध्य मुंबई), डॉ. श्रीकांत शिंदे (कल्याण) आणि विनायक राऊत (रत्नागिरी-सिंधूदुर्ग) यांचा समावेश आहे. स्वतंत्रपणे विधेयक मांडणाऱ्या राज्यातील पहिल्या पाच खासदारांमध्ये गोपाळ शेट्टी (उत्तर मुंबई) , डॉ. श्रीकांत शिंदे, सुप्रिया सुळे, श्रीरंग बारणे आणि राहुल शेवाळे यांचा समावेश आहे.