न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०२. जुलै. २०२०) :- कोरोनाबाधित रुग्णांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यासाठी रुग्णवाहिका उपलब्ध होत नसल्याचा तक्रारी येत होत्या. केवळ रुग्णालयात नेण्यासाठी वाहन उपलब्ध नसल्याने कित्येक तास रुग्णांना ताटकळत राहावं लागत होतं. आता यावर उपाय म्हणून उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र सरकारने सगळ्या खासगी रुग्णवाहिका ताब्यात घ्यायचा निर्णय घेतला आहे. आता रुग्णवाहिकांचा दर सरकार ठरवणार आहे. याबाबत सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे आदेश (GR) काढण्यात आला आहे.
खाजगी रुग्णवाहिका आणि वाहने अधीग्रहित करताना त्यांचा दर निश्चित करून ते उपलब्ध करून देण्यात येईल. २४ तास ह्या अधीग्रहित केलेल्या रुग्णवाहिका आणि वाहने उपलब्ध राहतील. रुग्णवाहिका अधिग्रहीत करण्याची प्रक्रिया जिल्हाधिकारी (महापालिका क्षेत्र वगळता ) आणि महापालिका आयुक्त (महापालिका क्षेत्रात) राबवतील, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.
अधिग्रहित केलेली रुग्णवाहिका २४ तास उपलब्ध असेल. तसेच या रुग्णवाहिकेत स्मार्ट फोन, इंटरनेट सुविधा असेल. टोल फ्री १०८ रुग्णवाहिकेचे ॲप त्यात असेल ते या क्रमांकाच्या प्रणालीशी जोडले जाईल. त्याचबरोबर रुग्णवाहिकेला संपर्कासाठी रुग्णांना १०८ क्रमांक किंवा स्थानिक प्रशासनाने सुरू केलेल्या नियंत्रण कक्षाशी संपर्क साधता येईल, असेही शासनाने स्पष्ट केले आहे.