- राज्यातील करोना संसर्गाची पहिली लाट अजूनही सुरूच – मुख्यमंत्री ठाकरे…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३०. जुलै. २०२०) :- करोनामुळे देशाच्या अर्थकारणावर विपरित परिणाम झाला आहे. राज्यावर देखील याचा मोठ्या प्रमाणावर परिणाम झाला आहे. त्यामुळे पुण्यासह राज्यातील सर्वच महापालिकांची आर्थिक स्थिती गंभीर झाली आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकार केंद्राकडे निधीची मागणी करीत आहे. तसेच राज्य सरकारमार्फत जेवढी शक्य आहे तेवढी मदत आम्ही देत आहोत, असे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुण्यातील बैठकीत शहरातील लोकप्रतिनिधींना दिले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत करोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील विधानभवनात गुरुवारी बैठक झाली.
या बैठकीला कामगार व राज्य उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे-पाटील, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे,
मावळ लोकसभेचे खासदार श्रीरंग बारणे, पिंपरी-चिंचवडच्या महापौर उषा ऊर्फ माई ढोरे, पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, जिल्हाधिकारी नवल किशोर राम तसेच वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी आणि लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, सुरुवातीच्या काळात मुंबई आणि पुण्यातच करोनाचे रुग्ण आढळत होते. आता राज्यातील अनेक भागात आढळून येत आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य सरकार प्रत्येक जिल्ह्याला सर्वतोपरी मदत करीत आहे. राज्यातील करोनाच्या संसर्गाची पहिली लाट संपलेली नसून आणखी किती लाट येईल याबाबत माहिती नाही. मात्र, आता आपल्याला करोनासोबत जगायला शिकलं पाहिजे, अशी भूमिका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या बैठकीत शहरातील लोकप्रतिनिधींसमोर मांडली.
करोना संकटाच्या काळात लोकप्रतिनिधी आणि प्रशासनामध्ये समन्वय पाहिजे. पुणे शहर आणि जिल्ह्यातील परिस्थिती लक्षात घेता, उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार हे पुण्याचेच आहेत. त्यामुळे स्वत: अजितदादाचं पुण्याच्या परिस्थितीवर लक्ष असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यावेळी नमूद केलं.