न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३१. जुलै. २०२०) :- रावेत येथील पवना नदीपात्र परिसरात उभारलेल्या स्मशानभूमीमुळे पर्यावरणीय हानी होऊ शकते, या हार्मनी को – ऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटीने दाखल केलेल्या याचिकेची राष्ट्रीय हरित लवादाने ( एनजीटी ) गंभीर दखल घेतली आहे.
येत्या सहा आठवड्यांत पिंपरी चिंचवड महानगरपालिका, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (एमपीसीबी) आणि पर्यावरण विभागासह प्रतिवादी असलेल्या सात जणांनी म्हणणे सादर करण्याचे आदेश एनजीटीने दिले आहेत. न्यायिक अधिकारी शेवो कुमार सिंग आणि तज्ज्ञ सदस्य डॉ. सत्यवान सिंग गार्बयाल यांनी याबाबत नोटीस काढली आहे.
रावेत गावात पवना नदीवरील स्मशानभूमीचे काम हे नदीच्या पूर नियंत्रण रेषेच्या आत सुरू आहे. त्यामधून पर्यावरणाचे नुकसान होऊ शकते. बांधकामाबाबत कोणतीही परवानगी घेण्यात आलेली नाही. त्यामुळे हे बांधकाम जमीनदोस्त करावे, अशी मागणी याचिकेद्वारे करण्यात आली आहे. स्मशानभूमी शेजारी असलेल्या हार्मनी को-ऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटीने अॅड. सौरभ कुलकर्णी यांच्यामार्फत ही याचिका दाखल केली आहे.