- आर्थिक आव्हानं असतानाही राज्य शासनाकडून कामगारांना प्राधान्य – इरफानभाई सय्यद…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४. ऑगस्ट. २०२०):- महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातील नोंदित सक्रिय (जीवित) बांधकाम कामगारांना आणखी ३ हजार रुपयांचे अर्थसहाय्य देण्यात येणार आहे. बांधकाम कामगारांच्या खात्यात दुसरा हप्ता मंजूर करण्याबाबत कामगार मंत्री यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करून निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा फायदा राज्यातील १० लाख बांधकाम कामगारांना मिळणार असून सदर अर्थसहाय्य वाटपावर मंडळामार्फत ३०० कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत.
कोविड -१९ या विषाणूच्या प्रादूर्भाव कालावधीत २ हजार रुपयाच्या अर्थसहाय्याचा पहिला हप्ता एप्रिल २०२० मध्ये मंजूर करण्यात आला होता. या निर्णयानुसार जुलै २०२० पर्यंत राज्यातील ९ लाख १४ हजार ७४८ बांधकाम कामगारांच्या बँक खात्यात अर्थसहाय्याची रक्कम जमा करण्यात आली. यासाठी मंडळाने १८३ कोटी रुपये खर्च केले.
सध्या राज्यात लॉकडाऊन कालावधीला टप्प्याटप्प्याने शिथिलता देण्यात येत आहे. तथापि, इमारत व इतर बांधकामे अद्यापही पूर्ववत सुरू झालेली नाही त्यामुळे बांधकाम कामगांराना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. ही बाब विचारात घेऊन नोंदित बांधकाम कामगारांना ३ हजार रुपयाचा अर्थसहाय्याचा दुसरा हप्ता मंजूर करण्याचा निर्णय कामगार विभागाने घेतला. आज घेतलेल्या निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी सुरू होणार असून याबाबत कार्यवाही करण्याचे निर्देश महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळास देण्यात आल्याची माहिती कामगार मंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी दिली.
लॉकडाऊनमुळे बांधकाम कामगार मेटाकुटीस आला आहे. अजूनही बांधकाम क्षेत्र उभारी घेऊ शकले नाही. त्यामुळे राज्यातील बांधकाम कामगारांचे प्रश्न सोडवून त्यांना अपेक्षित लाभ मिळावा, यासाठी महाराष्ट्र मजदूर संघटनेच्या माध्यमातून शासनाकडे पाठपुरावा सुरु होता. शासनाने सहानुभूतीपूर्वक या कामगारांचा विचार करून कामगारांच्या खात्यावर विशेष अनुदान द्यावे, अशी संघटनेची आग्रही मागणी होती. त्या अनुषंगाने राज्य सरकारने नेमलेल्या सुकाणू समितीने राज्यातील नोंदणीकृत कामगारांना अनुदान देण्याचा प्रस्ताव सरकारकडे पाठविला होता. पहिला टप्पा कामगारांच्या खात्यात वर्ग झाला आहे. आज शासन निर्णय होऊन दुसऱ्या टप्प्यात ३ हजार रुपयांचे अर्थसहाय्य जाहीर केले आहे. त्यामुळे राज्यातील १२ लाखांहून अधिक नोंदणीकृत कामगारांना त्याचा प्रत्यक्ष लाभ होणार आहे. महाविकास आघाडी सरकारसमोर मोठे आर्थिक आव्हानं असतानाही राज्यातील कामगारांचा प्राधान्याने विचार करून, राज्यातील कामगारांना मोठा धीर दिला आहे. त्याबद्दल उद्धव साहेबांच्या महाविकास आघाडी सरकारचे आभार.
– इरफानभाई सय्यद (कामगार नेते)…