न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ सप्टेंबर २०२०) :- स्टेट बँकेनं आपल्या किरकोळ कर्जदारांना आणि गृहकर्जदारांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला असून मोठी घोषणा केली आहे. बँकेकडून संबंधित कर्जदाराला कर्ज फेडण्यासाठी दोन वर्षांचा अधिक कालावधी देण्यात येईल किंवा कर्जाची पुनर्रचना करून त्याचा कालावधी २ वर्षापर्यंत वाढवणार आहे. स्टेट बँकेचे व्यवस्थापकीय संचालक सी.एस. शेट्टी यांनी यासंदर्भातील घोषणा केली.
“करोनाचा फटका बसलेल्या व्यक्तीची नोकरी किंवा त्याचा रोजगार पुन्हा केव्हा सुरू याचा विचार करून त्यावर कर्जाच्या पुनर्रचनेचा कालावधी ठरवण्यात येईल,” असं शेट्टी यांनी नमूद केलं.
१ मार्च २०२० पूर्वी ज्यांनी कर्ज घेतलं आहे आणि करोनाच्या पार्श्वभूमीवर ज्यांच्या रोजगारावर परिणाम झाला आहे त्यांनाच या सुविधेचा लाभ देण्यात येणार आहे. स्टेरिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक सूचनांनुसार ग्राहकांना ६ महिन्यांपासून दोन वर्षांपर्यंतचा कालावधी मिळू शकतो. ही सुविधा कोणत्या ग्राहकाला ६ महिन्यांसाठी मिळेल आणि कोणाला २ वर्षांसाठी हे सर्व बाबी पडताळल्यानंतरच समजणार आहे.