- स्थानिक नगरसेवक केवळ कुंपणाच्या अंतर्भागातच व्यस्त…
- शहर राष्ट्रवादीच्या संदीप काटेंची स्थानिक नगरसेवकांच्या कारभारावर टीका….
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ ऑक्टोबर २०२०) :- पिंपळे सौदागर येथील हॉटेल क्रिस्टल रस्ता काटे झिंजुर्डे मळा परिसरातील डांबरी रस्त्यांना लष्कराच्या हद्दीतील पावसाच्या पाण्यामुळे नदीचे स्वरूप प्राप्त होत आहे. दरवर्षी नेहमीप्रमाणे येथील रस्त्यावर पावसाच्या पाण्याचे साम्राज्य निर्माण होऊन येथील लोकवस्तीची नाकाबंदी होताना दिसत आहे. लष्कराच्या हद्दीतून येणारे पावसाचे पाणी रोखण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकरांसह स्थानिक नगरसेवक व लष्कर प्रशासनासोबत समन्वय साधूनदेखील मूळ समस्या जाग्यावरच आहे. स्थानिक नगरसेवकाच्या आडमुठेपणामुळे व निष्क्रीयतेमुळे अद्यापही हा प्रश्न सुटलेला नाही. नगरसेवक केवळ कुंपणाच्या अंतर्भागातच नागरिकांच्या समस्येवर लक्ष पुरवीत असून, उर्वरित लोकवस्तीला वाऱ्यावर सोडून रामभरोसे कारभाराचा नमुना पेश करीत आहे, असा आरोप शहर राष्ट्रवादीचे युवा कार्यकर्ते संदीप काटे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केला आहे.
पत्रकात त्यांनी म्हटले आहे की, पिंपळे सौदागर येथील काटे झिंजुर्डे मळा आणि लष्कराची हद्द एकमेकांना लागून आहे. येथे सुमारे एक हजार घरांची लोकवस्ती आहे. सध्या पावसाचा जोर वाढल्यामुळे लष्कराच्या हद्दीतील पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात लोकवस्तीत येत आहे. २०० एकर डिफेन्स लँडचा लोकवस्तीकडे उतार असल्यामुळे हे पाणी नागरिकांच्या घरासमोर, रस्त्यावर जमा होत आहे. त्यामुळे विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिकांना पायी चालत जाणे अशक्य झाले आहे. वाहनचालकांना पाण्यातून मार्ग काढत जावे लागत आहे. मात्र, स्थानिक नगरसेवक या प्रश्नांकडे दुर्लक्ष करीत आहेत. त्यांना केवळ त्यांच्या सोयीचे पडलेले दिसते. त्या सोयीनुसारच ते त्या-त्या भागातील कामे मार्गी लावताना दिसतात.
मुळात कित्येक वर्षांपासून या प्रश्नाचे भिजत घोंगडे पडून असताना स्थानिक नगरसेवकांच्या वेळकाढूपणामुळे नागरिकांना गैरसोयींना सामोरे जावे लागत आहे. माजी विरोधी पक्षनेते असताना देखील त्यांनी सभागृहात हा मुद्दा उपस्थित करून प्रश्न तडीस नेणे आवश्यक होते. मात्र त्यांनी त्यांच्या सोयीनुसार या प्रश्नाचे भिजत घोंगडे कायम ठेवले आहे. सत्ताधारी भाजप महापौरांनी या प्रश्नी सकारात्मक पाउल उचलले होते. लष्करी अधिकाऱ्यांशी बैठकीची तयारी केलेली असताना स्थानिक नगरसेवकाच्या कचखाऊ धोरणामुळे दरवर्षी येथील पक्क्या डांबरी रस्त्यावर पावसाच्या पाण्याचे साम्राज्य निर्माण होऊन नागरिकांना त्रास होत आहे. आतातरी या प्रश्नाचे गांभीर्य ओळखून स्थानिक नगरसेवकांनी मुद्द्याचे राजकारण न करता लष्करी अधिकाऱ्यांशी बैठक घेऊन समोपचाराने मार्ग काढावा, अन्यथा लोकं माफ करणार नाहीत, असे या पत्रकात संदीप काटे यांनी म्हटले आहे.
या भागातील लष्कराची हद्द निश्चित केलेली आहे. लष्करासोबत चर्चा करून हद्दीवर सुरक्षाभींत बांधण्याचा निर्णय पिंपरी-चिंचवड महापालिकेने घेतला होता. मात्र, काही कारणास्तव तो रखडला आहे. जनजीवन विस्कळीत होऊ नये, यासाठी आयुक्तांनी लष्कर प्रशासनासोबत समन्वय साधून याठिकाणी सुरक्षाभिंत किंवा इतर बाबींची पडताळणी करून त्याची उभारणी करावी. जेणेकरून लष्कर हद्दीतील पावसाचे पाणी लोकवस्तीत येणार नाही. विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरीक आणि लहान मुलांना त्याचा त्रास होणार नाही.
– संदीप काटे राष्ट्रवादीचे युवा कार्यकर्ते