- २०१९ च्या लोकसभा निवडणूकीत मतदार मोदींना पुन्हा ‘चहा’ विकायला पाठवतील
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ डिसें.) :- मंगळवारी जाहिर झालेल्या पाच राज्यातील विधानसभा निवडणूकीचा निकालात भाजपाची पिछेहाट म्हणजे जनतेने ‘हुकूमशाहीला’ दिलेला गर्भित इशारा आहे. असे पिंपरी चिंचवड शहर जिल्हा कॉंग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे यांनी सांगितले.
मंगळवारी (दि. ११) राजस्थान, मध्यप्रदेश, तेलंगणा, मिझोराम, छत्तीसगड येथील विधानसभा निवडणूकांचा निकाल जाहिर झाला. यामध्ये कॉंग्रेसला लक्षणिय यश मिळाले. त्यामुळे पिंपरी चिंचवड शहर जिल्हा कॉंग्रेस पार्टीचे अध्यक्ष सचिन साठे यांच्यासह कॉंग्रेस कार्यकर्ते व पदाधिका-यांनी पिंपरीत जल्लोष केला. यावेळी कार्यकर्त्यांनी फटाके फोडून, पेढे वाटून आनंद साजरा केला.
यावेळी साठे म्हणाले की, या पाचही राज्यातील जनतेने भाजपाला नाकारले आहे. मागील साडेचार वर्षात प्रधानसेवक म्हणवून घेणा-या पंतप्रधानांची वाटचाल हुकूमशाहीकडे सुरु झाली होती. पक्षातील वरिष्ठांसह विरोधी पक्षांना देखील अपमानास्पद वागणूक देण्याचे मोदींचे धाडस दिवसेंदिवस वाढत चालले होते. त्यांच्या एककल्ली व हुकूमशाही राजवटीला कंटाळून कालच रिजर्व्ह बॅंकेच्या गर्व्हनरांनी आणि आज उपगर्व्हनरांनी राजीनामा दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधिशांना देखील माध्यमांसमोर येऊन गा-हाणे मांडण्याची वेळ देशाच्या इतिहासात प्रथमच घडली. माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव आणि डॉ. मनमोहनसिंग यांनी १९९१ साली केलेल्या ‘गॅट’ करारानुसार देशाची अर्थव्यवस्था महासत्तेकडे वाटचाल करीत असताना मोदींनी दोन वर्षांपुर्वी उत्तर प्रदेशातील निवडणूकीमध्ये विरोधकांना त्रास देण्याच्या उद्देशाने देशातील १२५ कोटी जनता, केंद्रिय मंत्रीमंडळ, रिझर्व्ह बॅंक आणि आरबीआयच्या गर्व्हनरांना देखील अंधारात ठेवून नोटाबंदीची घोषणा करुन ताबडतोब अंमलबजावणी केली. यामुळे देशभर अर्थव्यवस्था खिळखिळी झाली.
नोटा बदलण्यासाठी बँकेच्या रांगेत अनेकांना जीव गमवावा लागला. देशातील छोटे, मोठे, उद्योजक, व्यापारी, कामगार, शेतकरी, गृहिणी महागाईने त्रस्त झाले आहेत. दरवर्षी दोन कोटी रोजगार उपलब्ध करु असे सांगणा-या मोदींनी नोटाबंदी केल्यामुळे बेरोजगारीत वाढ झाली. ‘मेक इन इंडिया’चा फसवा फुगा फुटला आहे. साडेचार वर्षातील अपयश झाकण्यासाठी ‘राममंदिराचा’ मुद्दा या पाचही राज्यातील विधानसभा निवडणूकीत पुढे आणण्यात आला. सर्व समान्य जनतेच्या खात्यात पंधरा लाख रुपये जमा होण्याएैवजी आहे तीच खात्यातील शिल्लक, जीएसटी व इतर करांच्या नावाखाली बँका कापू लागल्यामुळे जनतेच्या पैशांवर सरकारचा डोळा आहे हे लक्षात आले.
सरकारी बँकांकडून हजारो कोटींचे कर्ज घेऊन मोदी, मल्ल्या परदेशात पळाले त्यांच्यावर कारवाई करण्याऐवजी सरकार सामान्य जनतेला वेठीस धरु लागले आहे. हजारों कोटींचे उद्योगपतींचे कर्ज माफ करणा-या सरकारकडे शेतक-यांना, उच्च शिक्षण घेणा-या मागासवर्गीय व इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांना अनुदान देण्यासाठी पैसा नाही. कॉंग्रेसने सुरु केलेल्या ‘आधारकार्ड’ ला विरोधात असताना विरोध करणारे, मोदींनी सत्तेत येताच पॅनकार्ड, आधारकार्ड शिवाय नागरीकांचे जगणे मुश्किल केले. सर्वोच्च न्यायालयाने फटकारल्यानंतरही त्यांच्या डोळ्यावरील सत्तेची धुंदी उतरलेली नाही. भाजपाला व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एकाधिकारशाहीला देशातील पाचही राज्यातील जनतेने नाकारले आहे. पण आता २०१९ च्या लोकसभा निवडणूकीत मतदार त्यांना पुन्हा ‘चहा’ विकायला पाठवेल असा विश्वास साठे यांनी व्यक्त केला.
मंगळवारी पाच राज्यातील निवडणूक निकालात कॉंग्रेसला मिळालेल्या यशामुळे पिंपरी चिंचवड शहर जिल्हा कॉंग्रेस पार्टीचे अध्यक्ष सचिन साठे यांच्यासह कॉंग्रेस कार्यकर्ते व पदाधिका-यांनी पिंपरीत जल्लोष केला.