- उन्नतीकडून २०२१ झाडांचे मोफत वाटप करून नववर्षाचे स्वागत…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०१ जानेवारी २०२१) :- पिंपळे सौदागर येथील उन्नती सोशल फाऊंडेशच्या वतीने पिंपळे सौदागर येथील स्व. बाळासाहेब कुंजीर क्रीडांगण याठिकाणी विविध जातीच्या सुमारे दोन हजार एकवीस झाडांचे मोफत वाटप करून नववर्षाचे स्वागत करण्यात आले. उन्नतीच्या वतीने ग्रीन पिंपळे सौदागर करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. यावेळी झाडे लावा झाडे जगवा, पर्यावरण वाचावा जीवन वाचावा असा नारा देण्यात आला.
यावेळी उन्नती सोशल फौंडेशनचे संस्थापक संजय भिसे, अध्यक्षा कुंदा भिसे, नगरसेवक शत्रुघ्न काटे,सामाजिक कार्यकर्ते सतीश कांबळे,आनंद हास्य क्लब चेअरमन राजेंद्र जयस्वाल,अतुल पाटील,सागर बिरारी, तुषार काटे,मंदा वाळके,रमेश वाणी,विठाई मोफत वाचनालय अध्यक्ष सुभाषचंद्र पवार,मोहिनी मेटे ,संजय डांगे, विवेक भिसे ,त्याचबरोबर आनंद योगाहास्य क्लब, नवचैतन्य हास्यपरिवार यांच्यासह विविध सोसायटी चेरमन, सदस्य व नागरिक उपस्थित होते.
संजय भिसे म्हणाले, ” दिवसेंदिवस पर्यावरणाचा विशेषत: नैसर्गिक साधन संपत्तीचा ऱ्हास होत असल्याने तापमानात वाढ आणि हवामानातही बदल घडू लागले आहेत. यासर्व परिस्थितीमुळे निसर्गाचे ऋतुमान बदलत चालले आहे. यावर उपाय म्हणून पर्यावरणाचे संवर्धन, जतन व संरक्षण करुन समृध्द व संपन्न गावांची भौतिक निर्मिती करणे ही काळाची गरज मानून शहरात वृक्षलागवड आणि वृक्ष संवर्धनास प्राधान्य देणे आवश्यक आहे. तसेच अधिकाधिक झाडे लागवडीसाठी सर्वच घटकांनी वृक्षारोपणाच्या आणि पर्यावरण रक्षणाच्या कामात सक्रिय सहभाग नोंदविणे गरजेचे आहे “. तर ” सध्या विकासाच्या नावाखाली अनेक झाडांची कत्तल केली जाते. त्यामुळे झाडांची संख्या कमी झाली असून निसर्गाचा समतोल बिघडतआहे. त्यामुळे एक व्यक्ती एक झाड ही संकल्पना राबवून प्रत्येकाने एक झाड लावावे आणि त्याचे संगोपन करावे.
प्रत्येकांनी आपल्या मुलाप्रमाणे झाडांचे संगोपन करावे. पिंपळे सौदागर हे स्मार्ट सिटी असल्याने त्या परिसराला ” ग्रीन पिंपळे सौदागर करण्याचा आमचा संकल्प आहे. त्यामुळे यावर्षी २०२१ झाडे मोफत वाटप करण्यात आले आहे. यामुळे नागरिकांनी त्याचे संगोपन व्यवस्थित करावे . असे मत उन्नती सोशल फाऊंडेशनच्या अध्यक्षा कुंदा भिसे यांनी व्यक्त केले.
नगरसेवक शत्रुघ्न काटे यांनी उन्नती सोशल फाउंडेशनच्या उपक्रमाचे कौतुक केले. उन्नतीच्या दरवर्षी मोफत झाडाचे रोपटे वाटप करण्याचा उपक्रम समाजपयोगी आहे. असाच कार्यक्रम समाजातील प्रत्येक नागरिकांनी राबविला पाहिजे. त्यासाठी पुढे या, असे आवाहन केले.


















