- प्राधिकरणातील “मकर संक्रांति २०२१ महोत्सवास” भेट…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ जानेवारी २०२१) :- पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या नगरसेविका व माजी उपमहापौर शैलजाताई अविनाश मोरे यांच्या वतीने दि. १६ जानेवारी रोजी पिंपरी-चिंचवडमध्ये “मकर संक्रांति महोत्सव २०२१” चे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवास प्रमुख उपस्थिती जिल्हापरिषद सदस्य व ऑल इंडिया शुगर मिल असोसिएशनच्या कायदेशीर समिती सह अध्यक्ष युवारत्न अंकिता हर्षवर्धन पाटील ह्या होत्या.
या प्रदर्शनात महिला उद्योजक आणि गृहिणींनी बनवलेल्या सर्वप्रकारच्या दर्जेदार वस्तू, खाद्यपदार्थ आणि माल एकाच ठिकाणी उपलब्ध करुन दिला आहे. अंकिता पाटील यांनी बचत गटांच्या स्टॉलला भेट दिली व महिलांनी बनवलेल्या नाविन्यपुर्ण वस्तू, खाद्यपदार्थ आणि विविध वस्तू आवडीने खरेदी केल्या.
अंकिता पाटील म्हणाल्या की, ‘आजची स्त्री ही अधिक कार्यक्षम आणि धडाडीची झालीय. विविध संघर्षाने तिने स्वत:चं अस्तित्व सिद्ध केलं आहे. पण उद्योग क्षेत्रात आजही म्हणावं तसं तिचं अस्तित्व आजही जाणवत नाही. भारतात उद्योग क्षेत्रात स्त्रियांना खूप वाव आहे. गरज आहे जास्तीत जास्त स्त्रियांनी उद्योग क्षेत्राकडे वळण्याची. त्याच बरोबर व्यावसायाभिमुख अभ्यासक्रमांकडे मुलींचा ओढा वाढतोय ही समाधानकारक बाब नक्कीच आहे. घर, संसार, मुलं या सर्वांची जबाबदारी सांभाळत व्यवसायात उतरताना काही गोष्टी स्त्रियांनी जाणून घ्याव्यात.
उद्योगाची सुरुवात ‘गृहोद्योगा’ पासून सुरुवात करणं कधीही चांगलं. घरच्या घरी इतर सर्व जबाबदाऱ्या सांभाळून करता येणारे अनेक उद्योग आपल्याकडे उपलब्ध आहेत. ज्यामध्ये एकतर स्वत:च्या वेळेनुसार काम करता येते. गुंतवणूकही कमी लागते आणि आवडीतूनच व्यवसायाची निवड केल्यामुळे समाधानही मिळते. गरज ही शोधाची जननी आहे असं म्हणतात. हे खरंही आहे म्हणूनच याच गरजेतून गृहोद्योग उभे राहतात उदाहरण घ्यायचं झालं तर विणकाम, मेणबत्ती, पणती बनवणं, पाळणाघर सुरु करणं, ब्युटीपार्लर, मसाला उद्योग, छंदवर्ग, ज्वेलरी तयार करणं, माशांची शेती, एक ना अनेक हजारो पर्याय उपलब्ध होतात. परंतु कोणत्याही व्यवसायात उतरताना प्रथम त्या व्यवसायाचा अभ्यास करून मगच पुढचं पाऊल टाकावं असे अंकिताताई पाटील म्हणाल्या.
यशस्वी उद्योजक होण्यासाठी स्त्रियांकडे काही उपजत गुण असतातच. यामुळे महिलांनी आपल्यातील सुप्त गुणांना हेरून जास्तीत जास्त स्त्रियांनी व्यवसायाकडे वळायला हवं. स्त्रियांना उपजतच वेळेचे नियोजन, व्यवहार, आर्थिक अंदाजपत्रक, संवाद कौशल्य, सामंजस्य अशा उद्योजकाला लागणाऱ्या गुणांची शिदोरी असते. त्यामुळे त्यांच्यासाठी हे फायदेशीरच ठरते, असेही त्या म्हणाल्या.
यावेळी नगरसेविका तथा माजी उपमहापौर शैलजा अविनाश मोरे, भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष अनुप अविनाश मोरे, विजय शिनकर, सचिन कुलकर्णी, शर्मिला महाजन, ज्योती कानिटकर, वैभवी घोडके, निलीमा कोल्हे उपस्थित होते.