- स्थायी माजी अध्यक्ष व आमदारांच्या आग्रहामुळे विमा योजना कामगारांच्या माथी..
- राष्ट्रवादीच्या योगेश बहलांचा भाजपवर आरोप…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ जानेवारी २०२१) :- विमा योजना लागू न करता धन्वंतरी स्वास्थ योजना कायम राहावी, अशी आग्रही मागणी महापालिकेचे सर्व कामगार तसेच, कर्मचारी महासंघ करीत असताना निव्वळ स्थायी समितीचे माजी अध्यक्ष व आमदारांच्या आग्रहामुळे विमा योजना लागू करण्यात आली आहे. त्या कारणांमुळे सभागृहात आम्हाला बोलू दिले नाही. योजना लागू करण्यासाठी भाजप नेत्यांना तब्बल ६ कोटींची टक्केवारी मिळाली आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक योगेश बहल यांनी बुधवारी (दि. २०) पत्रकार परिषदेत केला.
यावेळी विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, नगरसेवक भाऊसाहेब भोईर, अजित गव्हाणे, माजी नगरसेवक प्रशांत शितोळे आदी उपस्थित होते.
बहल म्हणाले की, विमा योजनेसाठी २१ कोटींचा निधी वर्गीकरणास बहुमताच्या जोरावर भाजपकडून मंजुरी देण्यात आली. विरोधकांना त्यांची मते मांडू देण्यास काहीच हरकत नव्हती. टक्केवारीसाठी विनाचर्चा वर्गीकरणास घाईघाईत मंजुरी देण्यात आली. भाजप बहुमताचा गैरवापर करीत आहे. धन्वंतरी योजनेत गेल्या ५ वर्षात दरवर्षी सरासरी १५ कोटींचा खर्च होत होता. विमा योजनेत एका वर्षात २८ कोटी तसेच, ८ टक्के जीएसटी आणि प्रशासकीय खर्च आहे. हा भुर्दंड पालिकेस करावा लागणार आहे.
भाजपच्या लुटीमुळे दुप्पटीने खर्च वाढला असून, त्यांचा फायदा विमा कंपनीस आहे. अलिशान मोटारीतून येणाऱ्या ठेकेदारांसोबत रिंग करण्यात भाजपचे पदाधिकारी व नेते व्यस्त आहेत, असा आरोप बहल यांनी केला. विमा योजनेविरोधात राष्ट्रवादी न्यायालयात दाद मागणार आहे. तसेच, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे तक्रार करणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
एफडीआर व बँक गॅरंटीचे बोगस प्रमाणपत्रे देणारे १८ पेक्षा अधिक संख्येने ठेकेदार आहेत. दोषी ठेकेदार हे भाजप पदाधिकाऱ्यांचे नातेवाईक तसेच, अप्रत्यक्ष भागीदार आहेत. त्यामुळे त्यांना वाचविण्याचा खटाटोप भाजपसह आयुक्त श्रावण हर्डीकर हे करीत आहेत. पोलिसांकडे जाऊन थेट फौजदारी गुन्हा दाखल न करता आयुक्त हे पत्र देण्याचे ‘ उद्योग ‘ करीत आहेत. त्या प्रकरणातून पळवाटा काढण्याचा प्रयत्न आयुक्त करीत आहेत, असा आरोपही योगेश बहल यांनी केला.