अभाविपचे ५५ वे अधिवेशन चिंचवड येथे संपन्न…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०८ फेब्रुवारी २०२१) :- युवकांनी नेहमीच बंडखोर असावे. विद्यार्थी दशेत अनेक सत्याग्रह आणि आंदोलनात आम्ही सहभागी झालो. परिषदेने अनेकांच्या विचारांना चालना दिली. जे.पी नारायण यांचे भ्रष्टाचार विरोधात आंदोलन सुरू होते त्यावेळी आम्ही त्यात सहभागी झालो. देशात आणीबाणी लादण्यात आली. त्यावेळी देखील सत्याग्रह केले. व्यक्ती स्वातंत्र्य,अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी लढा दिला. आंदोलन ही देशाची गरज आहे, असे स्पष्ट केंद्रिय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी चिंचवड येथे व्यक्त केले.
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे ५५ वे अधिवेशन चिंचवड येथे आयोजित करण्यात आले होते. या अधिवेशनाचे उदघाटन जावडेकर यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते. प्रमुख अतिथी म्हणून पद्मश्री गिरिश प्रभुणे, ‘अभाविप ’चे राष्ट्रीय अध्यक्ष छगनभाई पटेल, महापौर उषा ढोरे, सत्तारूढ पक्षनेता नामदेव ढाके, उपमहापौर केशव घोळवे, स्वागत समितीचे अध्यक्ष पिनॅकल ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचे सुधीर मेहता,डी.वाय.पाटील विद्यापीठाचे सोमनाथ पाटील, बालाजी विद्यापीठाचे बी. परानधमन,कोहिनुर ग्रुपचे कृष्णकुमार गोयल, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सारंग जोशी, महाराष्ट्र प्रदेश मंत्री स्वप्नील बेगडे, स्वीकृत नगरेसेवक मोरेश्वर शेडगे, पिंपरी-चिंचवड महानगर मंत्री प्रथमेश रत्नपारखी, शिल्पा जोशी आदी मान्यवर उपस्थित होते.
सरकाने शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी अनेक योजना राबवल्या आहेत. ७० हजार कोटींच्या एक कर्जमाफी पेक्षा हे काम नक्कीच मोठे आहे. पिक-विमा, किसान-सन्मान निधीच्या माध्यमातून लाखो शेतकऱ्यांना आर्थिक लाभ भेटला. गरिबांचे जीवनमान सुधारण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. मीडियाने सरकावर टीका करावी, सल्ले द्यावेत पण अफवा पसरवून देशात अशांती पसरवू नये. देश बदलत आहे. पुढे जात आहे आणि आणखी पुढे जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
पद्मश्री गिरिश प्रभुणे यांनी गुरूकुल संस्था सुरू करण्याचा उद्देश आणि त्यासाठी मदत लाभलेल्या निष्ठावंताचे त्यांनी आभार मानले. झोपडपट्टी भागापर्यंत विकास पोहचणे हा खरा आत्मनिर्भर भारत या संकल्पनेचा आत्मा असल्याचे त्यांनी नमूद केले. समाजातील सर्वांनाच समान न्याय मिळावा, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.