- सिरम, एचए व हाफकीनची एकत्रित बांधणी करणं गरजेच…
- केंद्र व राज्याने पुढाकार घ्यावा; विजय पाटलांची आग्रही मागणी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०१ मे. २०२१) :- सध्या महाराष्ट्र राज्यामध्ये कोरोनाने थैमान घातले आहे. दरोरोज कोरोना बाधितांची व बळींची संख्या वेगाने वाढत आहे. त्यातच लसनिर्मिती अपुरी होत असल्यामुळे लसीकरणाची मोहीम ही कासवाच्या गतीने मार्गक्रमण करीत आहे. राज्य सरकार लसीच्या तुटवड्यामुळे हतबल झालेले आहे. लसनिर्मिती करणाऱ्या भारतात सध्या मोजक्याच कंपन्या असल्यामुळे त्यांचीसुद्धा लसनिर्मिती करण्याची क्षमता तोकडी आहे. त्यामुळे राज्याची लस मोहीमेला १५ मे पर्यंत ब्रेक लागला आहे.
राज्याला तातडीने १२ कोटी लसींची आवश्यकता आहे. एवढया मोठ्या प्रमाणात गरज असताना आता राज्य सरकारने व केंद्र सरकारने तातडीने पावले उचलणे गरजेचे आहे. योग्य नियोजन केल्यास पिंपरी चिंचवड शहरामध्येच महिन्याला ४ कोटी लसनिर्मिती शक्य आहे. त्यासाठी सिरम इन्स्टिट्यूट, भारत सरकारच्या उपक्रमातील हिंदुस्थान अँटीबाओटिक्स कंपनी आणि मुंबईतील हाफकीन इन्स्टिट्यूट ह्यांनी एकत्रितपणे येऊन पिंपरीमध्ये तयार असलेल्या एच ए कंपनीमध्येच तातडीने लसीच्या उत्पादनासाठीचे बदल करून निर्मिती शक्यता पडताळने गरजेचे ठरते.
कोरोना चे वैश्विक संकट असून, जगभर कोविड १९ विषाणूच्या लाटीचे सत्र सुरू आहे. त्यासाठी वेगाने लसनिर्मिती करून मात करण्याशिवाय आता पर्याय नाही. त्यासाठी नवीन लसनिर्मितीच्या कंपन्या उभ्या करणे आवश्यक आहे. सिरम कंपनीकडे कोविड लसीचे तंत्रज्ञान आहे, हिंदुस्थान अँटीबाओटिक्सकडे १९५४ पासूनचा पेनिसिलिन, अँमोक्सिलीन औषध निर्मितीचा अनुभव आहे. हाफकीन इन्स्टिट्यूटला १५ एप्रिलाच भारताच्या केंद्र सरकारने लसनिर्मितीला परवानगी दिलेली आहे. अश्या जागतिक दर्जाच्या संस्था आपल्या राज्यात किंबहुना आपल्याच शहरात आहेत. देशहितासाठी आता तीनही संस्थांनी एकत्र येणे आवश्यक आहे. एच ए कंपनीकडे १२०० प्रशिक्षित कामगारांचे मनुष्यबळ व ८७ एकर मोकळी जागा आहे, सिरम कंपनीकडे कोरोना विरोधी लसनिर्मितीचे तंत्रज्ञान आहे, आणि हाफकीन कडे पोलियो धरून एकूण ६५ प्रकारच्या लसीच्या निर्मितीचा अनुभव आहे. अश्या दिग्गज संस्थांकडे केंद्रीय मंत्री मीनाक्षी लेखी, खासदार डॉ. हिना गावित, डॉ.रघुनाथ माशेलकर, डॉ आनंद बंग, आदर पुनावाला यांच्यासारखे अनुभवी सल्लागार, संचालक आहेत. राज्य सरकारने तत्परतेने या सर्वांना भेटून पिंपरीमध्येच लसनिर्मिती करण्यासाठी प्रेरित करावे व योग्य निधी उपलब्ध करून द्यावा. सर्वशक्तीनिशी प्रयत्न करावे.
कोरोनाची सद्यस्थिती पाहता ह्या लढाईला अनेक वर्षांचा कालावधी लोटू शकतो. लसीकरणाची मोहीम वेगाने करणे हाच एकमेव पर्याय आता जगापुढे शिल्लक राहिलेला आहे. लसनिर्मितीसाठी कंपन्या सुरू करण्याचे धाडसी पाऊल राज्य सरकार व केंद्र सरकारने उचलणे आवश्यक आहे. त्याकरिता हा तीनही संस्थांच्या अनुभवाचा उपयोग करणे आवश्यक आहे.
विजय व पाटील – अध्यक्ष प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समिती…