- आमदार लक्ष्मण जगताप यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे मागणी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६. मे. २०२१) :- कोरोनासारख्या एका प्रकारच्या नैसर्गिक आपत्तीमुळे अनाथ झालेल्या लहान मुलांना शासनाने “वात्सल्य योजने”अंतगर्त मोफत शिक्षण व वयाच्या १८ वर्षापर्यंत दरमहा पाच हजार रुपये आर्थिक मदत करणे गरजेचे आहे. जेणेकरून अशा अनाथ मुलांचे जगणे सुसाह्य होईल व जीवनास उभारी मिळेल, अशी मागणी आमदार लक्ष्मण जगताप यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात त्यांनी म्हटले आहे, कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे राज्यात अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाली आहेत. अशी अनेक मुले आहेत, ज्यांनी या महासाथीमुळे आपले आई-वडील गमावले आहेत. कुटुंबातील लहान मुलांच्या डोक्यावरील छत्र हरविल्याने उद्ध्वस्त झालेल्या कुटुंबातील अनाथ मुलांना सामाजिक दायित्व म्हणून सरकारने आधार देणे कर्तव्य आहे.
“वात्सल्य योजने” अंतर्गत कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे उद्ध्वस्त झालेल्या कुटुंबातील अनाथ मुलांना मोफत शिक्षण व आर्थिक मदत देणेबाबत शासन स्तरावर तातडीने उपाययोजना करणेबाबत संबंधितांना योग्य ते कार्यवाहीचे आदेश निर्गमित करावेत, असे या निवेदनात त्यांनी म्हटले आहे.