- पालकमंत्री अनिल परब यांच्याकडून ‘देवदूताची’ उपमा..
- पूरग्रस्तांच्या अश्रूंनी मन हेलकावलं – पांडाभाऊ साने…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०२ ऑगस्ट २०२१) :- रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यात मुसळधार पावसाने कहर केला. आता पाऊस थांबला आहे, पूराचे पाणी ओसरले आहे पण, यामुळे झालेले मोठं नुकसान आणि डोळ्यासमोर उद्धवस्त झालेला अनेकांचा संसार पाहून सामाजिक कार्यकर्ते तथा भाजपचे युवा नेते पांडाभाऊ साने यांच्या डोळ्यात पाणी तरळलं होत. पण संवेदनशीलता बाजूला ठेवत, कठीण परीस्थितीतून मार्ग काढीत, खंबीरपणे साऱ्या आवाहनांना सामोरं जात, प्रसंगी छातीचा कोट करीत पांडाभाऊंनी पूरग्रस्तांसाठी मौल्यवान मदत नुकतीच पोहोच केली.
‘भयंकर आहे सगळं. जेव्हा स्थानिकांशी बोललो तेव्हा अंगावर काटा येत होता. छत नाही, संसार उघडे पडले आहेत. प्रत्येक घराघरात एकच चित्र आहे. मी हे चित्र उघड्या डोळ्यांनी पाहिलं. काहीच उरलं नाही.’ गावंच्या गावं उद्धवस्त झाली आहेत. हे बघताना खूप भयानक वाटत होतं. देव आणखी किती परीक्षा घेणार. कोरोना येतोय, पूर येतोय.’ अशा शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
याबाबत माहिती देताना पांडाभाऊ म्हणाले, कोरोनाच्या संकटातून सावरत नाही, तोपर्यंत महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना पूर आणि भूस्खलनाचा मोठा फटका बसला. रत्नागिरीसह चिपळूनमधील अनेक भागमध्ये जलप्रलय तर घरांवर दरड कोसळल्यानं अनेक जण बेपत्ता होती. कोकणातील आपल्या आप्त व नातेवाईकांवर दुःखाचा डोंगर कोसल्यामुळे प्रभाग क्रमांक १ चिखली मोरेवस्तीतील कोकणवासीय उद्विग्न अवस्थेत असल्याचे समजले. बाधीतांपर्यंत जीवनावश्यक मदत तातडीने पोहोचविण्यासाठी मदतकार्य सुरु केले. अनेक ठिकाणी पाकिटामधून येणारे तयार अन्न टाकून देण्याची वेळ पूरग्रस्तांवर आली होती. पूरग्रस्तांची खरी गरज पाहून स्व-खर्चातून व प्रभागातील दानशूर व्यक्तींच्या सहकार्यातून जीवनावश्यक वस्तू, मेडिकल व इतर उपयोगी वस्तूंचे कीट तयार केले. हे मदतकार्य घेऊन स्वतः मंगळवारी (दि. २७) रोजी कोकणातील चिपळूणच्या दिशेने कूच केली, असेही ते म्हणाले.
मुसळधार पाउस व अनेक ठिकाणी नेटवर्क नसल्यामुळे संपर्क करण्यात अडचणी येत होत्या. या अडचणीवर मात करीत चिपळून तालुक्यातील कोंडफणसवडे गावात आमचा चमू पोहोचला. एनडीआरफशिवाय जेथे कोणीही पाउल ठेवू शकत नाही, अशा ठिकाणी आम्ही पाउल टाकलं. मदत पोहोचताच ग्रामस्थांनी मदतीसाठी वेढा घातला. गावकऱ्यांचे सांत्वन करून त्यांना दिलासा दिला व जीवनावश्यक वस्तूंचे कीटचे त्यांना वाटप केले. अश्रू ढाळत त्यांनी आभार मानले. त्यानंतर काडवली / केळणे गावात आम्ही पोहोचलो. गाव मात्र ओसाड पडलं होतं. आजूबाजूला केवळ चिखल व ग्रामस्थांच्या घरात पाणी दिसतं होतं. येथील सरपंच राकेश महाडिक यांच्या मदतीने ग्रामस्थांचा शोध घेऊन त्यांना मदत पोहोच केली. जवळच असणाऱ्या धामनंद गणपतीवाडी धनगरवाडीकडे मोर्चा वळविला. येथील पंधरागाव संस्थेचे आनंद लक्ष्मण गोरे व सरपंच विष्णू तुकाराम कदम यांच्या मदतीने ग्रामस्थांशी संवाद साधला. एवढ्या दूरवर येवून, ‘अशा कठीण परिस्थितीत आम्हाला मदत करताय तुम्ही खरे देवदूत आहात’, मदत घेताना ग्रामस्थांना आश्रू अनावर होत होते. अवघ्या २१ कुटुंबाची लोकवस्ती असणाऱ्या पोसरे खुर्द गावावर तर आभाळच फाटलं होतं. भूस्खलनात १६ जणांचा मुडदा पडला होता. त्यात कमावते, लहान-अबाल-वृद्धांचा समावेश होता. अश्रू अनावर होत, भयावह स्थितीत अंगाची कापरं उडाली होती. कसेबसे त्यांचे सांत्वन करीत त्यांना किटचे वाटप केले. सरपंच साजिदा सलीम खेरडकर व उपसरपंच रविंद्र मोहिते यांनाही धीर दिला. त्यानंतर आम्ही कळंबस्थ गावात पोहोचलो, तिथे विवेक महाडिक या उपसरपंचाचं घरचं वाहून गेल होतं. शुद्ध पाणी प्यायला मिळत नव्हतं, तिथे त्यांनाही धीर देत मदत केली. बहादूरशेख नाका या गावात व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. आमच्या कार्यकर्त्यांनी लोकांना गाळ काढण्यासाठी मदत केली. तेथील गणेश हाळदे व गावकऱ्यांना मदतीचे कार्य करीत, खेर्डीकडे मोर्चा वळविला. येथील शेतकऱ्यांची आंब्याची, काजूची झाडं वाहून गेली होती. त्यांनाही मदतीचा हात पुढे करीत सांत्वन केले, असेही ते म्हणाले.
दरम्यान रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री अनिल परब, शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव, आमदार योगेश कदम यांचा ताफा पूरग्रस्तांच्या पाहणीसाठी परिसरात आला होता. आमचे मदतकार्य पाहून तेही भारावले. आमचे मार्गदर्शक महेशदादांच्या मार्गदर्शनाखाली हे कार्य करीत असल्याची त्यांना माहिती दिली. त्यावेळी त्यांनी आमचे आभार मानत कौतुक केलं.
पूरग्रस्तांमध्ये जगण्याची नवी उमेद निर्माण करण्यासाठी मोरेवस्तीतील ग्रामस्थ, माझ्या प्रभागातील नागरिक पूरग्रस्तांच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत, असा दिलासाही त्यांना त्यावेळी दिला. मागील काही दिवसांपासून अनेकजण नेसत्या कपड्यांसह राहत होते. कोकणातील चिखल तुडवत लहान मुले व वयोवृद्धांसाठी तातडीने उबदार व कोरडे कपड्यांचे वाटप केले, दैनंदिन वस्तू त्यात गव्हाच्या पिठापासून, पाणी बॉटल, दुध पावडर, उपवासाचे पदार्थ व इतरही अशा जीवनावश्यक तर त्वचारोगावर लावण्यासाठी औषधे, महिलांसाठी सॅनिटरी नॅपकिन्स, डास चावू नये यासाठी मलमे-अगरबत्तीसह फर्स्टऐड, अशा जीवनावश्यक व मेडिकल किटचे खऱ्या लाभार्थ्यापार्यंत मी स्वतः जाऊन मदतकार्य पोहोचते केले. जेणेकरून १५ दिवस या वस्तूंवर त्यांची गुजराण होईल. इतका वस्तूंचा साठा त्यांना दिला आहे. यासाठी कार्यकर्त्यांनी मोठी मेहनत घेतली आहे. अजूनही मदतकार्य सुरूच आहे. असेही साने म्हणाले.
”आमदार महेश लांडगे यांचे सच्चे कार्यकर्ते पांडाभाऊ साने यांनी एनडीआरएफच्याही आधी पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पुढाकार घेत, गरजू लाभार्थ्यांपर्यंत मदतकार्य पोहोच केले. त्यांचे सांत्वन केले. धीर दिला, हे खरेच देवदूतासारखे कार्य आहे. आमदार महेश लांडगे यांचेही आभार. पक्षभेद विसरून त्यांनी पूरग्रस्तांसाठी केलेल्या त्यांच्या या समाज कार्यालाही माझा सलाम”…
– मा. अनिल परब, पालकमंत्री – रत्नागिरी जिल्हा…