- दुरुस्तीच्या कामासाठी वर्तुळाकार मार्ग दहा दिवस बंद…
- शहर मनसेच्या इशाऱ्याची पालिकेकडून दखल..
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०२ ऑगस्ट २०२१) :- पिंपरी चिंचवड महापालिकेने तब्बल ९६ कोटी रुपये खर्च करून बांधलेला निगडीतील भक्ती-शक्ती उड्डाणपूल मृत्यूचा सापळा बनला आहे. एका महिन्याच्या अंतरात उड्डाणपुलावर तीन अपघात झाले असून, त्यात तीन जणांचा मृत्यू झाला आहे. या तीनही मृत्यूस पालिका प्रशासनच जबाबदार असल्याचा आरोप मनसे गटनेता तथा मनसे शहराध्यक्ष सचिन चिखले यांनी केला होता. महापौर व आयुक्त यांनी पुलाची पाहणी करून उपाययोजना करण्याची मागणीही केली होती.
त्या मागणीची दखल घेत, महापौर उषा ढोरे व पालिका आयुक्त राजेश पाटील यांच्या शिष्टमंडळाने आज सोमवारी (दि. ०२) रोजी श्री छत्रपती शिवाजी महाराज आणि जगतगुरु संत तुकाराम महाराज उड्डाणपुलास भेट दिली. यावेळी उपमहापौर हिराबाई घुले, सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, स्थायी समिती अध्यक्ष नितीन लांडगे, विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, मनसे गटनेता तथा मनसे शहराध्यक्ष सचिन चिखले, नगरसेविका शैलजा मोरे, नगरसेवक अमित गावडे, प्रा.उत्तम केंदळे, कमल घोलप, शर्मिला बाबर, सह शहर अभियंता श्रीकांत सवणे आदी उपस्थित होते.
सचिन चिखले म्हणाले, पुणे-मुंबई महामार्गावरील वेगवान वाहतूक भक्ती शक्ती नवीन उड्डाणपुलावरून सुरू झाली. पुलावर गेल्या महिन्याभरात तीन वेगवेगळे अपघात झाले असून त्यात तिघांचा मृत्यू झाला. त्यामुळे पालिकेने वाहतुकीचे व्यवस्थितपणे नियोजन करावे अथवा पुलावरील वाहतूक बंद करावी, असा सूर स्थानिक रहिवाशांकडून व्यक्त होऊ लागला होता. पूल सुरू होण्यापूर्वी दीड वर्षे रहिवासी भागातून वाहनांसाठी पर्यायी व्यवस्था होती. तेव्हा एकही अपघात झाला नव्हता. मात्र, अर्धवट काम उरकून पूल वाहतुकीसाठी खुला केल्याने नागरिकांचा नाहक बळी गेला. मागणीसत्व महापौर व आयुक्तांनी उड्डाणपुलास भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला.
दरम्यान महापौरांनी सुरक्षिततेच्या विविध उपाययोजना तातडीने कराव्यात. दिशादर्शक फलक, स्पीड ब्रेकर टाकावेत. त्यासाठी वर्तुळाकार मार्ग उद्यापासून दहा दिवस बंद ठेवावा, अशा सूचना पालिका प्रशासनाला केल्या आहेत. मुंबईकडून पुण्याकडे आणि पुण्याकडून मुंबईकडे जाणारा मार्ग चालू राहणार आहे. दिलेल्या मुदतीत कार्यवाही झाली नाही तर, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आंदोलन करेल, असा इशाराही यावेळी चिखले यांनी दिल्याचे सांगितले.