न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ जाने.) :- पिंपरी चिंचवड शहरामध्ये विविध राज्यातुन तसेच जिल्ह्यातून नागरीक आपल्या कुटूबांचा उदरनिर्वाह करण्यासाठी वास्तव्यास आलेले आहेत. त्यात समाजातील वंचित व गोर-गरीब नागरिकांचा समावेश आहे. जे अंत्यविधीचा खर्चही भागवू शकत नाहीत. त्यांचासाठी महापालिकेने मोफत अंत्यविधीचा मागे ठराव केला होता. त्याची अंमलबजावणी करण्यात यावी, यासाठी शिवसेनेचे युवराज दाखले यांनी आयुक्तांना निवेदन दिले आहे.
मुंबई महानगरपालिका प्रांतिक अधिनियमानुसार राज्यातील नाशिक, अहमदनगर, मुंबई तसेच कोल्हापूर या ठिकाणच्या नागरीकांच्या अंत्यविधीचा खर्च महानगरपालिकेच्या वतीने केला जातो. याच धर्तीवर नागरीकांच्या अत्यंविधीचा खर्च करण्याचा ठराव आपल्या महानगरपालिकेत मंजुर केला आहे. माञ, या ठरावाची अंमलबजावणी आपल्या महानगरपालिकेच्या प्रशासनाकडुन केली जात नाही. त्यामुळे गोर-गरीब व सर्वसामान्य जनतेला अंत्यविधीच्या वेळी अनेक आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
याची आपण स्वत: गांभीर्याने दखल घेऊन, येत्या २१ दिवसांच्या आत सदरील ठराव अमलात आणण्याच्या सुचनावजा आदेश द्यावेत. अन्यथा शिवसेना स्टाईलने सर्वसामान्य जनतेला सोबत घेऊन, प्राथमिक स्वरूपामध्ये महानगरपालिकेच्या गेटवर अंत्यविधीचा कार्यक्रम केला जाईल. याकामी उद्भवणाऱ्या गोष्टींची जबाबदारी आपली व आपल्या प्रशासनाची राहील, असे या निवेदनात दाखले यांनी म्हटले आहे.