- तीनऐवजी दोन सदस्यांचा प्रभाग करा; कॉंग्रेसची मुख्यमंत्र्यांकडे मागणी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४. सप्टेंबर २०२१) :- महापालिका, नगरपालिका आणि नगरपरिषदांच्या निवडणुका बहुसदस्यीय पद्धतीने घेण्यासाठी काढण्यात येणाऱ्या अध्यादेशाचा मसुदा राजभवनावर पोहचला असतानाच, काँग्रेसने या प्रभागरचनेला उघड विरोध केला आहे. परिणामी, प्रभागरचनेवरून सरकारमधील मतभेद उघड झाले असून, बहुसदस्यीयऐवजी दोनच सदस्यांचा प्रभाग करावा, अशी भूमिका काँग्रेसने घेतली आहे.
अन्य महापालिकांसाठी बहुसदस्यीय प्रभागरचना अंमलात आणण्याचा वगळता निर्णय बुधवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. आता अध्यादेशाला राज्यपालांची मंजुरी मिळताच प्रभागरचनेचा मार्ग मोकळा होईल. मात्र, आता काँग्रेसने विरोधी भूमिका घेतल्याने हा अध्यादेश रोखला जातो का, यावर स्थानिक निवडणुकांचे गणित अवलंबून आहे.
फेब्रुवारी, मार्च महिन्यात होणाऱ्या १८ महापालिकांच्या निवडणुकांसाठी एकसदस्यीय पद्धतीने प्रभागरचना सुरू करण्याचे आदेशही राज्य निवडणूक आयोगाने दिले होते. मात्र, बुधवारी मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय फिरविण्यात आला. महापालिका निवडणुकीसाठी तीन, तर नगरपरिषद आणि नगरपालिकांसाठी दोनसदस्यीय पद्धत लागू करण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. हा निर्णय काँग्रेसला धोकादायक असल्याचे लक्षात आल्यानंतर काँग्रेसमध्ये प्रदेश काँग्रेस कमिटीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक गुरुवारी प्रदेश काँग्रेसचे मुख्यालय टिळक भवन येथे झाली. या बैठकीत बहुसदस्यीय प्रभागरचनेचे पडसाद उमटले. बहुसदस्यीयचा निर्णय बदलून तीनऐवजी दोन सदस्यांचा प्रभाग करावा, असा ठराव यावेळी मंजूर करण्यात आला. आता हा ठराव घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे काँग्रेसची भूमिका मांडली जाईल, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले.