- पिकअप चालकाचे नियंत्रण सुटले अनं गाडी थेट जमावात शिरली..
- चार महिला जागीच ठार; तीसहून अधिक दिंडीकरी जखमी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ नोव्हेंबर २०२१) :- कार्तिकी यात्रेनिमित्त खालापूर येथून आळंदीच्या दिशेने निघालेल्या वारकऱ्यांच्या दिंडीत पिकअप शिरल्याने मावळातील कान्हेफाटा येथे मोठा अपघात झाला आहे.
माऊली कृपा चॅरिटेबल ट्रस्ट, पायी दिंडी, उंबरे ता. खालापूर ही मंगळवार दि. ३० रोजी आळंदी येथे संत ज्ञानेश्वर महाराज समाधी सोहळ्यानिमित्त जात असताना, आज शनिवारी (दि. २७) रोजी सकाळी ७ वा. साते फाटा (ता. मावळ) मुंबई-पुणे महामार्गावर (एम एच १२ एस एक्स ८५६२) क्रमांक टेम्पो चालक राजीव प्रमोद चौधरी वय ३० रा. वाघोली पुणे) यांने भरधाव वेगाने टेम्पो पायी जाणाऱ्या दिंडीतील महिलांच्या अंगावर घालून त्यांना चिरडले. अपघात इतका भीषण होता की, अपघाताच्या ठिकाणी रक्ताचा सडा सांडला होता. महिलांच्या किंकाळ्या ऐकून परिसरातील नागरिकांनी धाव घेतली.
अपघातातील जखमींना कामशेत महावीर हॉस्पिटल, बढे हॉस्पिटल, कान्हे येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयात, सोमाटणे येथील पवना हॉस्पिटल मध्ये औषधोपचारासाठी दाखल केले आहे. पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्या आदेशानुसार अप्पर पोलीस अधीक्षक मित्तेश घट्टे, उप विभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र पाटील व पोलीस निरीक्षक विलास भोसले आदींनी घटनास्थळी जखमींची विचारपूस केली.
जयश्री आत्माराम पवार (वय ५४ रा. कर्जत, भूतीवली) सविता वाळकू यरम (वय ५८ रा. खालापूर, उंबरे ) आणि विमल चोरगे ( वय ५० रा. खालापूर), संगीता वसंत शिंदे (वय ५६ रा. कर्जत ता. खालापूर) या चार महिलांचा अपघातात मृत्यू झाला आहे. आरोपी टेम्पो चालक राजीव चौधरी याला पोलिसांनी तात्काळ अटक केली. या गुन्ह्याचा तपास पोलीस उप निरीक्षक विकास सस्ते करत आहेत.