न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०९ जानेवारी २०२१) :- महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबई महापालिकेच्या हद्दीतील ५०० चौरस फुटापर्यंतच्या घरांचा मालमत्ता कर रद्द करण्याची घोषणा करून मुंबई महापालिका क्षेत्रातील सुमारे १६ लाख घरकुलवासीयांना आर्थिकदृष्ट्या दिलासा दिला. पिंपरी चिंचवड शहरातही ५०० चौरस फुटापर्यंतचे सुमारे १ लाख ६० हजाराहून अधिक कुटूंबे राहत आहेत. त्यात पिंपरी चिंचवड महापालिकेनेही केंद्र, राज्य शासनाच्या वतीने म्हाडा, चिखली येथील घरकुलवासिय तसेच, गुंठा अर्धा गुंठा जागा घेवून स्वतःचे घरकुले अनेक कामगारवासीयांनी उभारली आहेत.
सन २०२० पासून कोरोना प्रादुर्भावामुळे अनेकांना नोकर्या गमावाव्या लागल्या. या घरकुलात अल्प उत्पन्न गटातील, अंध, अपंग, विधूर, मोलमजूरी करणारे, भाडे तत्वावर राहणार्यांनी स्वतःचे घरकुल उभारलेल्यांचा समावेश आहे. मुंबई महापालिकेप्रमाणे पिंपरी चिंचवड शहरातील घरकुलवासियांना त्यांना दरवर्षी भरावा लागणारा मालमत्ता कर रद्द झाला तर, त्यांची आर्थिक बचत होवून दिलासा मिळेल, यासाठी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, माजी केंद्रीय कृषीमंत्री शरदचंद्रजी पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, महापौर माई ढोरे आदींना (दि. ३) ई-मेलद्वारे पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेसचे व्ही.जे.एन.टी. सेलचे कार्याध्यक्ष गुलामअली भालदार यांनी विनंती निवेदन पाठविले होते.
त्याची दखल राज्याचे उपमुख्यमंत्री यांनी घेवून भालदार यांना ”आज आपला अर्ज कार्यालयास प्राप्त झाला असून योग्य त्या कार्यवाहीसाठी नगरविकास विभाग २ प्रधान सचिव यांना पाठविण्यात आल्याचे ई-मेलद्वारे कळविले आहे”. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शहरातील रहिवासियांची तात्काळ दखल घेतल्याबद्दल आनंद व्यक्त केला असून महाविकास आघाडी महाराष्ट्र राज्य सरकारच्या वतीने लवकरात लवकर ५०० चौरस फुटापर्यंच्या घरकुलवासीयांचे मालमत्ता कर रद्द करण्याचा निर्णय घ्यावा, अशी विनंती करण्यात आली आहे.