- पालिका आयुक्तांकडून पर्दाफाश; म्हणाले रोज पाणी देऊ शकत नाही…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ८ एप्रिल २०२२) :- पिंपरी – चिंचवड शहराला पूर्वीप्रमाणे ५१० एमएलडी पाणी दिवसाआड दिले जात आहे. दोन दिवसांचे पाणी एकदा दिले जात आहे. संपूर्ण शहराला सुरळीतपणे पाणीपुरवठा करण्याचा प्रयत्न आहे. मात्र, रोज पाणी देण्याचा विषय फसवा आहे, असे आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील बुधवारी (दि. ६) म्हणाले. ते पत्रकारांशी बोलत होते.
दररोज पाणी एप्रिल अखेरीस मिळणार का? या प्रश्नावर ते बोलत होते. आयुक्त पाटील म्हणाले की, संपूर्ण शहराला योग्य प्रकारे सुरळीत पाणीपुरवठा करण्याचा पालिकेचा प्रयत्न आहे. त्या दृष्टीने उपाययोजना केल्या जात आहेत. रोज पाणी देण्याचे नियोजन आहे. मात्र, परवानगी प्रतिसाद न मिळाल्याने फेरनिविदा काढणे, वीज खांब हटविणे, जागा ताब्यात घेणे, जलवाहिनी, तांत्रिक बाबी व इतर अडचणीमुळे कामे रखडतात. त्यात वेळ जात आहे. आंद्रा धरण पाणी योजनेतून निघोजे, तळवडे येथील पंप हाऊसमधून चिखली जलशुद्धीकरण केंद्रात दररोज १०० एमएलडी पाणी आणले जाणार आहे. ते पाणी शुद्ध करून परिसरातील भागांना पुरविले जाणार आहे. त्यासाठी वीजपुरवठा कामाची निविदा विलंबाने काढण्यात आली. निविदा प्रक्रिया व तांत्रिक बाबीमुळे त्यास विलंब झाला. मात्र, प्रत्यक्ष काम वेगात सुरू आहे. काम पूर्ण होईपर्यंत तात्पुरत्या स्वरूपात वीजजोड घेण्यात येणार आहे.
पाटील म्हणाले की, शहरातील उंच, सखल भागात पाणी पोहचत नसल्याने कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. त्या ठिकाणी टाकी बांधून पाणीपुरवठा केला जाणार आहे. तसेच, जलवाहिन्यांही टाकल्या जात आहेत. गळती रोखण्यावर भर दिला जात आहे. अनधिकृत नळजोड अधिकृत करण्यावर भर दिला जाणार आहे. पाण्याचा अपव्यय टाळणे, पाण्याचा पुर्नवापर करणे, सांडपाणी केंद्रात शुद्ध केलेले पाणी एमआयडीसीला देऊन शुद्ध पाणी घेतले जाणार आहे.