- आता समतेच्या संघर्षाचा आवाज दबला जाणार नाही…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ एप्रिल २०२२) :- भारतीय संविधानाने दिलेल्या अधिकारांवर गदा आणू पाहणाऱ्या तथाकथित कट्टरपंथीयांना उद्देशून आता समतेच्या संघर्षाचा आवाज दबला जाणार नाही, वाटल्यास गोळ्या घाला अशी विद्रोही बंड करणारी ‘तुमच्या एका गोळीवर माझं सुद्धा नाव लिहा’ अशी कविता सादर करून सागर काकडे या युवा कवीने प्रस्थापितांना जाब विचारला.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने पिंपरी येथे क्रांतिसूर्य महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार प्रबोधन पर्वाचे आयोजन करण्यात आले आहे. या पर्वात कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये सागर काकडे यांच्यासह आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ कवी बबन सरवदे, दंगलकार नितीन चंदनशिवे, सुमित गुणवंत, समाधान गायकवाड आणि जित्या जाली यांनी कविता सादर करून रसिक मनावर अधिराज्य केले.
संविधान आणि देशाची सामाजिक,राजकीय, सांकृतिक स्थिती तसेच आंबेडकरी चळवळीची दशा, दिशा आणि वाटचाल,यावर आधारित कवितांची मैफिल रंगली. यामध्ये बबन सरवदे यांनी “सारेच काही संपले नाही, इतक्यात मागे सरणार नाही” या कवितेच्या माध्यमातून आंबेडकरी चळवळीचा जाज्वल्य इतिहास जागृत केला. तर सुमित गुणवंत यांनी संविधान बचाव आणि जनजागृती यावर आधारित कविता सादर केली. दंगलकार नितिन चंदनशिवे यांनी “आमचा कांबळे” या कवितेच्या माध्यमातून सामान्य माणूस लोंकांसमोर उभा केला. समाधान गायकवाड यांनी “ना भेटले अजुनी कोणीच कळकळीचे, खोटेच नाव घेती सारे चळवळीचे” या कवितेच्या माध्यमातून चळवळीचे वास्तव मांडले.
स्थानिक कलाकारांनी गीत गायनाच्या माध्यमातून महामानवांना मानवंदना देऊन सकाळच्या सत्राला सुरुवात केली. शाहीर सुरेश सूर्यवंशी आसंगीकर यांच्या ‘पोवाड्यांचा कार्यक्रमाने रसिक प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. “सूर सरगम सुराली” हा अंध कलाकारांचा कार्यक्रम झाला. अंध कलाकारांनी आपल्या गायन कौशल्याने उपस्थित रसिक श्रोत्यांची मने जिंकली. अस्तित्व संस्था ठाणे, उन्मुक्त कलाविष्कार प्रस्तुत ‘अंधे जहाँ के अंधे रास्ते’ हे दोन अंकी मराठी नाटक सादर झाले. या नाटकात सफाई कामगारांच्या आयुष्यावर प्रकाशझोत टाकण्यात आला. सफाई कामगारांचे अस्तित्व आपण मान्य केले नाही तर आपले अस्तित्व राहणार का ? असा प्रश्न यातून उपस्थित केला. त्यांच्या दैनंदिन आयुष्यामध्ये त्यांना कशा अडचणींचा सामना करावा लागतो, काम करत असताना त्या कामाचा त्यांच्या वैयक्तिक आयुष्यावर किती खोलवर परिणाम होतो याचे ज्वलंत प्रतिबिंब या नाटकाच्या माध्यमातून साकारण्यात आले. यानंतर विशाल ओव्हाळ यांनी आपल्या गीत गायनाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला. बापू पवार यांनी आपल्या पोवाड्यांच्या माध्यमातून बाबासाहेबांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला. आकाशराजा गोसावी यांनी आपल्या पहाडी आवाजातून उपस्थितांमध्ये स्फूर्ती निर्माण केली. साधना मेश्राम यांचा प्रबोधनात्मक गीत गायनाच्या कार्यक्रमाने प्रेक्षकांची मने जिंकून घेतली. सुप्रसिध्द महागायक प्रकाशनाथ पाटणकर यांच्या गीतांच्या बहारदार कार्यक्रमातून प्रबोधन करण्यात आले.
दरम्यान, गुरुवार दि. १४ एप्रिल रोजी शहरातील सर्व प्रभागात कचरा संकलनाची प्लोगेथोन मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेत सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन महापालिका प्रशासनाणे केले आहे. सकाळी ६ वाजता अमोल जाधव आणि सहकारी, औरंगाबाद यांचा बुध्द भीमगीतांची परिवर्तनवादी मैफिल अर्थात निळी पहाट हा कार्यक्रम होणार आहे. सकाळी ८ वाजता रुपेश निकाळजे यांचा ‘क्रांतीचा साक्षीदार’हा एकपात्री नाट्यप्रयोग होईल. सकाळी ९.३० वाजता भारतीय बौध्द महासभा यांच्या संयोजनाने वंदना आणि समता सैनिक दलाची मानवंदना होईल. यावेळी आदिवासी तारपा कलानृत्यातून महामानवांना अभिवादन देखील केले जाणार आहे. एकता कर्मचारी संघटनेच्यावतीने सकाळी १० वाजता पिंपरी येथील क्रांतिसूर्य महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यावर हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे. सकाळी १०.३० वाजता ज्येष्ठ गायिका वैशाली शिंदे यांना पुरस्कार आणि मानपत्र देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. यानंतर त्यांच्या गीतगायनाचा कार्यक्रम होईल. दुपारी १२ वाजता ज्येष्ठ कवी गायक प्रतापसिंग बोदडे, कुणाल बोदडे आणि सारेगमप फेम अॅड. रागिणी बोदडे यांच्या महागीतांचा कार्यक्रम होणार आहे. दुपारी २.३० वाजता प्रबोधनकार सत्यपाल महाराज यांचे शिष्य इंजि. पवन दवंडे प्रस्तुत सप्तखंजेरीतून प्रबोधनाचा कार्यक्रम होईल. सायंकाळी ४ वाजता प्रकाशदिप वानखेडे यांचा ‘संविधानाचा आलाप’ हा कार्यक्रम होणार आहे. सायंकाळी ६ वाजता कुणाल वराळे आणि राधा खुडे प्रस्तुत गाथा युगपुरुषांची हा कार्यक्रम होईल. रात्री ८ वाजता कोसंबी बंधू कोल्हापूर यांचा ‘जयभीमचा नारा’ हा संगीतमय कार्यक्रम सादर होणार आहे. यामध्ये सुप्रसिध्द गायक अभिजीत कोसंबी, प्रसेनजीत कोसंबी, गायिका कविता राम आणि निवेदक प्रा. डॉ. सत्यजित कोसंबी यांचा सहभाग असेल.
शुक्रवार दि. १५ एप्रिल रोजी सकाळी ६ वाजता सुधाकर वारभुवन आणि मारुती जकाते यांचा गीतगायनाचा कार्यक्रम होईल. सकाळी ७.३० वाजता लेणी अभ्यासक सागर कांबळे ‘लेणी संवर्धन’ या विषयावर व्याख्यान देतील. सकाळी ८.३० वाजता म्युझिक मेकर्स प्रस्तुत एम.एम. शेख, कैलास शिंदे आणि सुमेध कल्हाळीकर यांच्या गीतांचा कार्यक्रम होईल. सकाळी १० वाजता गायक स्वप्निल पवार, निशांत गायकवाड, रोमियो कांबळे आणि मुन्ना भालेराव यांच्या गीतांचा कार्यक्रम होईल. सकाळी ११.१५ वाजता स्पर्धा परिक्षेत यश संपादन करणा-या शहरातील विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. सकाळी ११.३० वाजता सारेगमप फेम राहुल भोसले, मुंबई यांच्या गीत गायनाचा कार्यक्रम ‘भीम स्वर गंधार’हा कार्यक्रम संपन्न होईल. दुपारी १ वाजता प्रविण येवले प्रस्तुत भीमाचा किल्ला हा संगीतमय कार्यक्रम होणार आहे. दुपारी २.३० वाजता संगीत विशारद सुप्रसिध्द गायिका प्रज्ञा इंगळे यांचा तर ४ वाजता गायक संकल्प गोळे प्रस्तुत ‘संकल्प भीमरायाचा’ हा कार्यक्रम होईल. सायंकाळी ७ वाजता लांडगे सिस्टर, बेंजो वादक अविनाश लांडगे आणि ढोलकीपटू संतोष घाडगे यांचा म्युझिकल फ्युजनचा कार्यक्रम होईल. सायंकाळी ८ वाजता ज्येष्ठ गायक मनोहर अजमेरी यांच्या गायनाने प्रबोधन पर्वाची सांगता होणार आहे.