‘एकला चला रे’ची भूमिकाच राष्ट्रवादीला तारक..
अजितदादांच्या कोपरखळीने मित्र पक्ष घायाळ…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ७ जून २०२२) :- चारच दिवसांपूर्वी पिंपरी चिंचवड शहरात येऊन उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी शहरातील वातावरण राष्ट्रवादीमय केले. माझ्या विचारांच्या नगरसेवकांना सत्तेवर आणा; शहराचा पाच वर्षांचा बॅकलॉग भरून काढतो, असे आश्वासन देतानाचा कार्यकर्त्यांनाही निवडणुकीसाठी रिचार्ज केले. पालिका निवडणुकीस इच्छुक उमेदवारांना देखील सज्जड इशारा दिला. नवीन कार्यकर्त्यांना यंदा संधी द्यायची घोषणाही केली. त्याबरोबरच मित्र पक्षांना देखील कोपरखळी काढली. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आहे. राज्यात आणि जिल्ह्यात आम्ही समान कार्यक्रम घेऊन पुढे जायचे ठरवले आहे. स्थानिक निवडणुकीत मित्र पक्षांनी व्यावहारिक भूमिका घेतली तर, त्यांच्याबरोबर जाण्याची शक्यता आहे. अन्यथा पक्ष एकला चला रेची भूमिका घेण्याची शक्यता अधिक असल्याचा गौप्यस्फोटही त्यांनी केलाय.
राज्यात यशस्वी झालेली महाविकास आघाडी पिंपरी – चिंचवड महापालिका निवडणुकीतही होण्याची शक्यता आहे किंवा नाही, असाच त्यातून अर्थबोध होतोय. आघाडीबाबत राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना व काँग्रेस सकारात्मक असल्यास आणि प्रत्यक्षात आघाडी झाल्यास राष्ट्रवादीच्या काही माजी नगरसेवक व पदाधिकाऱ्यांना यंदाच्या निवडणुकीत ‘ ब्रेक ‘ घ्यावा लागू शकतो. त्यामुळे राष्ट्रवादीचे मोठे नुकसान होऊ शकते.
महापालिकेच्या ४६ प्रभागात १३९ जागांसाठी निवडणूक होणार आहेत. आरक्षण सोडत जाहीर झाली असली तरी ओबीसीसह निवडणूका घेण्यावर तिन्ही पक्षांचे एकमत झालेले दिसते. तसेच तारखेबाबतही स्पष्टता नसली तरी केव्हाही निवडणुका लागू शकतात. राज्यात आघाडीचे सरकार असल्याने पालिका निवडणुकीतही आघाडी होण्याबाबत राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे, शिवसेनेचे शहरप्रमुख अॅड. सचिन भोसले व काँग्रेसचे शहराध्यक्ष कैलास कदम हे स्थानिक पदाधिकारी सकारात्मक आहेत. त्यांना आघाडी होईल, अशी शास्वती वाटत आहे. मात्र पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील त्याप्रमाणे धोरण राबवावे लागेल, असेही ते सांगत आहेत.
शहरात राष्ट्रवादीची ताकद मोठी आहे. २०१७ च्या निवडणुकीत त्यांचे ३७ नगरसेवक होते. शिवसेनेचे ९ नगरसेवक पालिकेत होते तर, काँग्रेसचा एकही नगरसेवक नव्हता. आघाडी झाल्यास सध्याचे नगरसेवक व दुसऱ्या क्रमाकांची मते असलेल्या जागेचा आग्रह राष्ट्रवादीकडून सुरु आहे. ती संख्या १०० च्या पुढे आहे. शिवसेना आपल्या ९ जागेवरील हक्क न सोडता, दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या जागाही मागणार आहे. मुख्यमंत्री त्यांच्या पक्षाचे असल्याने अधिक जागांवर शिवसेनेने दावा केला आहे. तर, काँग्रेसकडूनही दोन आकडी संख्येचा आग्रह धरला जात आहे. चर्चेच्या गुऱ्हाळानंतर आघाडी झाल्यास प्राबल्य असलेल्या काही जागा राष्ट्रवादीला मित्र पक्षांना सोडाव्या लागतील. त्यामुळे त्या ठिकाणच्या माजी नगरसेवक व पदाधिकाऱ्यांना यंदा ब्रेक घ्यावा लागणार आहे. दुसरीकडे, बंडखोरी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. बंडखोरी रोखण्यासाठी पक्षश्रेष्ठींना कसरत करावी लागेल. तसेच, आघाडीचा फार्म्युला पिंपरी – चिंचवड शहरात लाभदायक ठरतो का, ते निवडणूक निकालावरून स्पष्ट होईल.
राष्ट्रवादीला यावे लागेल बॅकफुटवर..
खराळवाडी, गांधीनगर, अजमेरा कॉलनी प्रभाग क्रमांक १८ मध्ये काँग्रेसचे शहराध्यक्ष कैलास कदम व सद्गुरू कदम हे रिंगणात उतरण्याची शक्यता राजकीय वर्तुळात आहे. त्यामुळे त्या प्रभागातील राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवका घ्यावी लागेल. शिवसेनेचे माजी गटनेते राहुल कलाटे यांच्यासाठी राष्ट्रवादीचे मयूर कलाटे यांना थांबावे लागेल किंवा मयूर कलाटे यांना कुटुंबातील महिला सदस्यासाठी उमेदवारी घ्यावी लागेल. पिंपळे निलख प्रभागात भाजपचा राजीनामा दिलेले व राष्ट्रवादीच्या वाटेवर असलेले तुषार कामठे यांच्या जागेवरच काँग्रेसचे सचिन साठे यांना दावा केला आहे. या दोघापैकी एकाला संधी मिळू शकते. शिवसेना व काँग्रेसचे माजी नगरसेवक व पदाधिकाऱ्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसला अनेक ठिकाणच्या जागा सोडाव्या लागतील. त्यामुळे तेथील राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवक व पदाधिकाऱ्यांना माघार घेतल्याशिवाय पर्याय राहणार नसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.