- रुग्णालयातील दरवाढ; पाणीपुरवठा, स्मार्ट सिटीबाबत दिले स्पष्टीकरण…
न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ सप्टेंबर २०२२) :- पिंपरी चिंचवड महापालिकेचे नवनियुक्त आयुक्त शेखर सिंह यांनी गुरुवारी (दि. १५) रोजी सायं. ५.३० वा. कै. मधुकरराव पवळे सभागृहात पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी शहरातील विविध प्रलंबित विकासकामांशी निगडीत प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
महापालिकेने यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयांसह भोसरी, आकुर्डी, थेरगाव, जिजामाता या रुग्णालयांत तसेच, दवाखान्यांत अनेक सोयी – सुविधा वाढविल्या आहेत. रुग्णांच्या उपचार खर्चात झालेली वाढ लक्षात घेऊन सेवा शुल्कात वाढ करण्याचा प्रस्ताव वैद्यकीय विभागाने तत्कालीन आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांच्या समोर ठेवला होता. त्यास त्यांनी तत्काळ मंजुरी होती. त्यावर बोलताना आयुक्तांनी इतर महापालिका व शासकीय रुग्णालये आणि ससून सर्वोपचार रुग्णालयांच्या दरांच्या तुलनेत महापालिका रुग्णालयांचे दर कमीच आहेत, असा दावा करीत दरवाढीचे समर्थन केले आहे. त्यामुळे ही दरवाढ मागे घेण्याची शक्यता मावळली आहे.
नियमबाह्यपणे मिळकतींची हस्तांतरण नोंदणी करून महापालिकेची कोट्यवधींचे नुकसान करणाऱ्या करसंकलन विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, अशी ग्वाही आयुक्त शेखर सिंह यांनी दिली.
केवळ नोटरी प्रतिज्ञापत्र आणि कुलमुखत्यार पत्राद्वारे नियमबाह्य पद्धतीने तळवडे, चिखली विभागीय करसंकलन कार्यालयात असंख्य मिळकतींची नोंद
करण्यात आली आहे. तसेच, अनेक मिळकतींची विभागणी करण्यात आली आहे. त्यासंदर्भात पालिकेस तक्रारीही प्राप्त झाल्यात आहेत. दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावून कारवाई करण्याचे आदेश संबंधित क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी दिले आहेत. मात्र, त्यावर कोणतीही कारवाई केली जात नसल्याचे धक्कादायक चित्र आहे.
त्याबाबत आयुक्त म्हणाले, की याप्रकरणी तक्रार माझ्याकडे आली आहे. त्याबाबत तपासणी सुरू आहे. दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर नियमानुसार कारवाई केली जाणार आहे. लवकरच त्याबाबत तुम्हाला समजेल, असे त्यांनी स्पष्ट केले.
पिंपरी – चिंचवड शहराला दररोज पाणी मिळेल, याचे उत्तर आताच देता येणार नाही. पाणीपुरवठा व्यवस्था सुधारण्यावर भर दिला आहे. ऑक्टोबर महिन्याच्या मध्यापर्यंत शहराला निघोजे येथून १०० एमएलडी अतिरिक्त पाणी उपलब्ध होईल, असे महापालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांनी सांगितले.
आयुक्त सिंह म्हणाले की, निघोजे, तळवडे येथून इंद्रायणी नदीतून १०० एमएलडी पाणी चिखली जलशुद्धीकरण केंद्रात आणून ते शहराला पुरविले जाणार आहे. ते पाणी ऑक्टोबरच्या मध्यास उपलब्ध होईल. भामा आसखेड पाणी योजनेसाठी किमान अडीच वर्षांचा कालावधी लागणार आहे. आंद्रा व भामा आसखेड योजनेतून एकूण २६७ एमएलडी पाणी उपलब्ध होणार आहे. पाण्याचे स्त्रोत वाढविणे. तसेच, पाणीपुरवठा यंत्रणा सक्षम करण्याचे नियोजन सुरू आहे. त्यानंतर टप्पाटप्प्याने पाणीपुरवठ्यात सुधारणा केली जाईल. मात्र, आताच शहराला दररोज पाणी कधी मिळेल, याचे उत्तर देता येणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
अनेक वर्षापासून बंद असलेली पवना बंद जलवाहिनी प्रकल्प सुरु करण्याबाबत मावळातील शेतक-यांना विश्वासात घेतले जाईल. तसेच, राज्य शासनाकडे त्याबाबत पाठपुरावा करण्यात येत आहे. योग्य तोडगा काढून तो प्रकल्प मार्गी लावण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असे आयुक्तांनी स्पष्ट केले.
पिंपरी – चिंचवड स्मार्ट सिटीच्या वतीने एबीडी आणि पॅन सिटीअंतर्गत विविध प्रकल्प सुरू आहेत. अनेक प्रकल्प रखडले आहेत. त्याबाबत विचारले असता आयुक्त सिंह म्हणाले की स्मार्ट सिटीत विविध प्रकल्प सुरू आहेत. त्यात अनेक किचकट मुद्दे आहेत. ३१ मार्च २०२३ पर्यंत कामे पूर्ण करण्याचे नियोजन आहे. असे त्यांनी स्पष्ट केले.