न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ सप्टेंबर २०२२) :- महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाबाबत सर्वोच्च न्यायालयातील पुढील सुनावणी आता थेट १ नोव्हेंबरला होणार आहे. अपात्रतेच्या याचिकेसह इतर मुद्द्यांवर ही सुनावणी होणार आहे. मंगळवारी पार पडलेल्या सुनावणीनंतर आता राज्यातील सत्तासंघर्षाचा तिढा सुटण्यासाठी महिनाभर वाट पाहावी लागणार आहे.
एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या ४० आमदार आणि १२ खासदारांनी बंडखोरी केल्यानंतर खरी शिवसेना कुणाची? हा वाद निर्माण झाला आहे. विधिमंडळातील बहुमत शिंदे गटाच्या बाजूला असल्यामुळे खरी शिवसेना शिंदे गटाची असल्याचा दावा बंडखोर आमदारांकडून करण्यात आला आहे. बंडखोर आमदारांच्या अपात्रतेबाबत शिवसेनेने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेसह इतर मुद्द्यांवर १ नोव्हेंबरला सुनावणी होणार आहे.