- ‘ शैक्षणिक चळवळ आणि शिक्षणव्यवस्था ’ चर्चासत्रात तज्ञांच मत…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ नोव्हेंबर २०२२) :- सध्या शिक्षणाचे बाजारीकरण झाले असून खाजगी शिक्षण संस्थांचे पेव फुटले आहे. त्यामुळे आपल्या पाल्यांना दर्जेदार शिक्षण देणे सर्वसामान्यांना आवाक्याबाहेरचे होत असल्याने शिक्षण गळतीचे प्रमाण वाढत चालले आहे. असुरक्षितता आणि जातीयता यामुळे काही पालकांना भीती वाटत असल्याने ते पाल्यांना उच्चशिक्षण देण्याची मानसिकता ठेवत नाहीत. शिक्षण महाग झाल्याने गरिबांना शिक्षणापासून वंचित राहावे लागत आहे. त्यामुळे योग्य शिक्षणासह गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि धर्मनिरपेक्ष शिक्षण व्यवस्था टिकवणे हे शिक्षण व्यवस्थेसमोरील आव्हान ठरत आहे, असे मत ‘शैक्षणिक चळवळ आणि शिक्षणव्यवस्था’ या विषयावरील चर्चासत्रात सहभागी झालेल्या युवा वक्त्यांनी व्यक्त केले.
क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले यांच्या स्मृतीदिनाचे औचित्य साधून महापालिकेच्या वतीने २८ नोव्हेंबर रोजी पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याशेजारील मैदानात विविध प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात आयोजित या चर्चासत्रामध्ये युवा वक्ते सर्वजित बनसोडे, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे प्रबल मेहरोत्रा, कविता म्हात्रे, मुस्लिम विचारवंत पैगंबर शेख यांनी सहभाग घेतला होता. तर सूत्रसंचालन विजय गायकवाड यांनी केले.
सर्वजित बनसोडे म्हणाले, बहुसंख्य वर्गाला शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा इतिहास या देशाला आहे. आता शिक्षणाचा अधिकार मिळाला आहे मात्र शासनाच्या वतीने शिक्षणावर अधिक खर्च होणे अपेक्षित आहे. परंतु, दिवसेंदिवस शासकीय शाळांची संख्यादेखील कमी होत चालली आहे. त्यामुळे बहुसंख्य समाज घटकांना शिक्षण घेणे आता परवडत नाही. शिक्षण हे फक्त शिक्षण राहिले नसून सध्या त्याचे बाजारीकरण सुरु आहे. वास्तविक पाहता, शिक्षण हा नफ्याचा विषय नाही. शिक्षणाने जातव्यवस्था बदलली पाहिजे. परंतु, तसे होताना दिसून येत नाही. उलट विविध माध्यमांद्वारे विद्यार्थ्यांच्या मनात जातीव्यवस्थेबद्दलच्या भावना अधिक तीव्र होताना दिसून येत आहेत. शिक्षणाचे धार्मिकीकरण हा गंभीर विषय बनत चालला असून तर्क आणि विज्ञानाला फाटा देऊन शिक्षण व्यवस्थेत असे विषय जाणीवपूर्वक घुसवले जात आहेत. ही चिंतेची बाब असून देशाच्या विकासाला यामुळे खीळ बसत आहे, अशी चिंता बनसोडे यांनी यावेळी व्यक्त करीत नव्या शैक्षणिक धोरणात अनेक बाबी एकांगी असून या धोरणाचा त्यांनी कडाडून विरोध केला.
प्रबळ मेहरोत्रा यांनी नवीन शैक्षणिक धोरणाविषयी आपले मत व्यक्त केले. नवे धोरण सर्वसमावेशक असल्याचा दावा त्यांनी यावेळी केला. ज्या कायद्यामुळे उच्च नीच असा भेद केला जातो असे कायदे नसले पाहिजेत. त्यामुळे समान नागरी कायदा लागू झाला पाहिजे असेही ते म्हणाले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात सुरु करण्यात आलेल्या अथर्वशिर्ष अभ्यासक्रमावर मत व्यक्त करताना ते म्हणाले, धर्मातील श्रद्धा जोपासण्याचा अधिकार भारतीय संविधानाने आपल्याला दिला आहे. त्यामुळे काही संस्थानी या विद्यापीठाशी संलग्न होऊन असे अभ्यासक्रम सुरु केले तर त्यात वावगे काय? असे मेहरोत्रा म्हणाले. कोणत्याही धर्मातील संस्थांना असे संलग्न अभ्यासक्रम सुरु करता येऊ शकतात. बहुतेक शिक्षण संस्थामध्ये देखील धर्माशी निगडीत असे अभ्यासक्रम सुरु आहेत. ज्यांना ते शिकण्यात रस आहे ते या अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेतात. शिक्षण योग्य तर मिळालेच पाहिजे, परंतु ते दर्जेदार देखील असावे.
कविता म्हेत्रे म्हणाल्या, समाजात तेढ निर्माण करण्यापेक्षा सामाजिक हित समोर ठेवून मार्गक्रमण केले पाहिजे. यासाठी दर्जेदार शिक्षण महत्त्वाचे आहे. या देशात शिक्षण मोफत करण्यासाठी स्वातंत्र्यानंतर अनेक वर्षे उलटली. श्रीमंत आणि गरीब असा टोकाचा भेट केला जात असून गरीबांना दर्जेदार शिक्षण मिळत नाही, यामुळे शिक्षण व्यवस्थेत नव्या प्रकारची वर्णव्यवस्था निर्माण होत आहे. आर्थिक सुबत्ता असणाऱ्यांना चांगले शिक्षण आणि गरिबांना शिक्षणापासून वंचित राहावे लागत आहे. शिक्षणामध्ये समानता असणे आवश्यक आहे. सामाजिक न्यायाचे तत्त्व शेवटच्या घटकांपर्यंत गेले पाहिजे. मात्र, शिक्षणाचा आज खेळखंडोबा सुरु आहे. श्रीमंतांची मुले उच्चश्रेणीच्या इंग्रजी माध्यमांच्या शाळेत तर गरिबांची मुले सुविधांची उणीव असलेल्या साधारण शाळेत शिकतात. ही दरी कमी होणे गरजेचे आहे. मुलींचे गळतीचे प्रमाण यात अधिक असून सर्वांसाठी योग्य शिक्षणासह गुणवत्तापूर्ण शिक्षण असावे. समाजात अजूनही मुलींना दुय्यम स्थान दिले जाते. अजूनही मुलींना पिंडदान करू दिले जात नाही. तसेच मुली अजूनही सुरक्षित नाहीत. घराबाहेर पडलेली मुलगी जोपर्यंत घरी पोहचत नाही तोपर्यत घरच्यांची काळजी संपत नाही. असुरक्षितता आणि जातीयता यामुळे अजूनही काही पालक आपली मुलगी हुशार असून देखील तिला उच्चशिक्षण देण्यासाठी तयार नसतात. महिलांना जर आरक्षण मिळाले तर त्या आपल्या पुढे जातील याची पुरुषांना सतत भीती वाटत असते. म्हणून त्यांना काही ठिकाणी आरक्षण दिले जात नाही. शिक्षण हे विज्ञानावर आधारित असायला हवे परंतु, आधी समाजातील अंधश्रद्धेची भावना बदलणे गरजेचे आहे, असेही त्या म्हणाल्या.
मुस्लिम विचारवंत पैगंबर शेख म्हणाले, अनेक वर्षे आपण प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे गुलामगिरीत जगलो. स्वातंत्र्यानंतर लोकशाही मध्ये आपला प्रवास सुरु झाला असून संविधानाच्या माध्यमातून प्रत्येकाला आपला हक्क अधिकार प्राप्त झाला आहे. महिलांनी समान अधिकार देण्यासाठी पुरुषांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे. मुस्लीम समाजात मुलींच्या शिक्षणाचे प्रमाण कमी असून त्याबाबत समाजात प्रबोधन करून हे प्रमाण वाढविणे गरजेचे आहे. आधुनिक युगात मुलींच्या शिक्षणाला महत्व देणे ही काळाची गरज आहे. सर्व धर्मातील महिलांनी स्वतःवरील धार्मिक बंधने झुगारून या चौकटीतून बाहेर येण्यासाठी स्वतःहून प्रयत्न करणे गरजेचे आहे. शिक्षण हे धर्मावर आधारित नसावे. कोणत्याही धर्मातील चुकीच्या रूढी परंपरा बंद करण्यासाठी सामुहिक प्रयत्नांची गरज आहे. विशिष्ट धर्मातील नागरिकांना त्यांची देशभक्ती सिद्ध करायला भाग पाडणे योग्य नाही. समान नागरी कायद्याची मागणी केली जात असून एका धर्माला टार्गेट करून विशिष्ट धर्मातील परंपरांना लादण्यासाठी प्रयत्न केले जाऊ नयेत. सर्व धर्मातील चांगल्या बाबी या कायद्यात असल्या पाहिजेत. देश बळकट करण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन सकारात्मक भावनेने काम करणे आवश्यक आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.
चर्चासत्राला विशेष अधिकारी किरण गायकवाड यांच्यासह माजी नगरसेवक अॅड. गोरक्ष लोखंडे, सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब आडागळे, देवेंद्र तायडे, उत्तम कांबळे, सेवानिवृत्त अभियंता शरद जाधव, अनिल सूर्यवंशी, अॅड. विद्या शिंदे, शाम सोनावणे, भाऊसाहेब डोळस, प्रकाश डोळस, राहुल सोनावणे, राजू साळवे, कामगार नेते निवृत्ती आरवडे, तुकाराम गायकवाड आदी उपस्थित होते.
दरम्यान, सकाळी ११ वाजता शाहीर राजेंद्र कांबळे यांच्या पोवाड्यांच्या कार्यक्रमाने प्रबोधन पर्वाची सुरुवात झाली. दुपारी १ वाजता सिद्धार्थ मोरे यांच्या “मी जोतीराव फुले बोलतोय” हा एकपात्री नाट्यप्रयोगाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य केले. त्यानंतर साधना मेश्राम यांच्या “अभिवादन क्रांतीसूर्याला” या संगीतमय कार्यक्रमाने प्रेक्षकांची मने जिंकली. “जागर सत्यशोधकाचा ” अर्थात क्रांतीसूर्य महात्मा जोतीराव फुले यांच्या जीवनावर आधारीत काव्य ,नाट्य आणि संगीतमय कार्यक्रमाने प्रबोधन पर्वाच्या कार्यक्रमाची सांगता झाली.