- उन्नती सोशल फाउंडेशनकडून भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांची जयंती आणि नाताळ सण उत्साहात साजरा..
- कार्निवलमध्ये नागरिकांनी दिला एकजुटीचा, भाईचाऱ्याचा संदेश – कुंदाताई भिसे…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ डिसेंबर २०२२) :- पिंपळे सौदागर येथील उन्नती सोशल फाउंडेशनच्या वतीने भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांची जयंती आणि नाताळ सणानिमित्त खास ख्रिसमस कार्निवलचे रविवारी (दि. २५) रोजी बाळासाहेब कुंजीर मैदानावर आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम ‘ रामनामा ‘ च्या गजरात उत्साहात साजरा झाला.
सर्वप्रथम उन्नती सोशल फाउंडेशनच्या अध्यक्षा कुंदाताई भिसे आणि पी के स्कूलचे संस्थापक जग्गनाथ काटे यांच्या हस्ते माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. यावेळी उद्योजक संजयशेठ भिसे, पवना सह. बँकेचे उपाध्यक्ष जयनाथ काटे, प्रकाश झिंजुर्डे, आनंद हास्य क्लबचे राजेंद्रनाथ जयस्वाल, गुलाब काटे, उमेश शेलार, ऑल सिनिअर सिटीझन असोसिएशनचे अध्यक्ष रमेश वाणी, मधुकर पाटील, भानुदास काटे पाटील, कांबळे, विजय भांगरे आदी उपस्थित होते.
दरम्यान उन्नती सोशल फाउंडेशन आणि कुंदाताई भिसे यांच्या दिनदर्शिकेचे मान्यवरांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. कुंदाताई यांनी हाती भगवा घेऊन तो अवकाशात उंचावला. त्यावेळी उपस्थितांना टाळ्यांचा कडकडाट केला. विशेषत: जय श्रीराम गीतावर लहान-अबाल थोरांनी आणि महिलांनी ठेका धरत जल्लोष निर्माण केला. नाताळनिमित्त मुलांसाठी खास लकी ड्रॉ चे आयोजन केले होते. त्यातील वीस भाग्यवंत मुलांना आकर्षक आणि सहभागी मुलांनाही बक्षिसाचे वाटप करण्यात आले. कुंदाताई यांनी लहान मुलांना चॉकलेटचे वाटप केले. व्यासपीठावरील तरुणींचे परंपारिक नृत्य पाहून अनेकजन प्रभावित झाले होते. कार्यक्रमात जादूगर आरएफ यांच्या कलाविष्कारांनी रंगत वाढविली. यावेळी विविध क्षेत्रातील महिला आणि खेळाडूंचा सन्मान करण्यात आला.
कुंदाताई भिसे म्हणाल्या, देशात आणि जगात ख्रिस्ती बांधवांचा ख्रिसमस हा सण उत्साहात साजरा होतो. ख्रिसमसच्या पूर्वसंध्येला, मोठ्या संख्येने लोक आपापल्या मित्र-मंडळी आणि नातेवाईकांसह चर्चच्या ठिकाणी पाहोचतात. परंतु आज या देशभरातील नाताळचा उत्साह ख्रिसमसनिमित्त आयोजित आमच्या ‘ ख्रिसमस कार्निव्हल ‘ मध्ये अनुभवयास मिळाला. या कार्निवलमध्ये केवळ ख्रिश्चनच नव्हे तर सर्वच धर्मियांनी एकत्र येत ‘ जय श्रीराम ‘ म्हणत एकजुटीचा, भाईचाऱ्याचा आणि सर्वधर्म समभाव एकात्मतेचा संदेश देत कार्निवलचा उत्साह आणखीनच वाढविला.
















