- महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे व्यसनमुक्ती अभियान…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० डिसेंबर २०२२) :- महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून व्यसन मुक्ती अभियानांतर्गत ” जानेवारी १५ तारखेपर्यंत बाणेर, निगडी व पिंपरी चिंचवड परिसरातील परिसरातील कॉलेजमधे व्यसन मुक्ती प्रबोधन कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे. आयुर्वेद महाविद्यालय, निगडी आणि फिजियोथेरेपी कॉलेज, निगडी येथे व्यसन मुक्ती प्रबोधन व्याख्यान देण्यात आले.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि परिवर्तन ट्रस्ट च्या कार्यकर्त्यांनी विद्यार्थ्याशी संवाद साधला. परिवर्तन ट्रस्ट निर्मित व्यसनाची सुरुवात आणि त्यांचे दुष्परिणाम सांगणारी शॉर्ट फिल्म दाखविली. रेश्मा कचरे यांनी एखादी व्यक्ती व्यसनांकडे का ओढली जाते हे सांगितले. हे सांगताना त्या म्हणाल्या की केवळ गंमत किंवा आग्रह म्हणून सुरुवात होते. संपन्नता, स्वभाव, दुःखे, निराशा, रिकामपणा, संगत वगैरे अनेक कारणे यात येतात. नंतर ती व्यक्ती त्या व्यसनावर पूर्णपणे अवलंबून राहते. संबंधित पदार्थ मिळाला नाही तर त्या व्यक्तीला मानसिक तसेच शारीरिक त्रास होतो.
मिलिंद देशमुख यांनी सांगितलं की अशिक्षितांइतकीच सुशिक्षितांमध्येही व्यसने प्रमाण अधिक आहे. व्यसनधिनतेकडे वळण्याची सुरुवात म्हणजे बियर पिणे. गंमत म्हणून सुरु केलेलं मद्यपानाचा शेवट व्यसनाधीनता कसा होईल हे सांगता येत नाही म्हणून बियर पिणे ह्या पहिल्या पायरीलाच नकार द्या असे त्यांनी सांगितलं.
पेस ग्रुप अहमदनगर चे मनोहर वायकर यांनी धूम्रपान आणि तंबाखू सेवानाचे होणारे दुष्परिणाम याची माहिती सांगितली. तंबाखू सेवनाने होणाऱ्या मुखाच्या विविध कर्करोगाची सचित्र माहिती दिली.
या वेळी उपस्तित विद्यार्थ्यांनी मद्यपान आणि धूम्रपान करणार नाही अशी सामूहिक शपथ घेतली. व्यसनमुक्ती हे त्या व्यक्तीसाठी, कुटुंबासाठी आणि समाजासाठी मोठेच आव्हान असते आणि चिकाटीने प्रयत्न केला तरच यात यश येऊ शकते. जेव्हा ही सवय प्राथमिक अवस्थेत असते तेव्हा ती सोडणे सगळयात सोपे असते, नंतर ते अवघड होत जाते. त्यामुळे आपल्या सभोंवती अशी व्यसनी व्यक्ती आढल्यास त्याला व्यसनमुक्ती साठी प्रवृत्त करा असे विद्यार्थ्यांना आवाहन करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी आयुर्वेद महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.रागिनी पाटील आणि फिजीओथेरपी कॉलेजच्या डॉ वर्षा कुलकर्णी यांचे मोलाचे सहकार्य व मार्गदर्शन लाभले. याप्रसंगी महाविद्यालयातील विद्यार्थी, अध्यापक आणि महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते अलका जाधव,अंजली इंगळे, शुभांगी घनवट, सुभाष सोळंकी, रामभाऊ नलावडे उपस्थित होते.
















