- आम्ही आता रस्त्यावरची लढाई जिंकली; कामगार नेते बाबा कांबळे यांची निकालावर प्रतिक्रिया…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ जानेवारी २०२३) :- रॅपिडो या मोबाईल आधारित टॅक्सी-बाईक सेवा देणाऱ्या कंपनीला मुंबई उच्च न्यायालयाने दणका दिला आहे. आज दुपारपासून राज्यातील रॅपिडोची सर्व सेवा बंद करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.
महाधिवक्ता बिरेंद्र सराफ यांनी रॅपिडोकडे आवश्यक परवाना नसल्याची बाब निदर्शनास आणून दिल्यावर न्यायालयाने हे निर्देश दिले. दरम्यान, याप्रकरणी २० जानेवारी रोजी पुन्हा सुनावणी होणार आहे.
गेल्या काही दिवसांपासून रॅपिडो बंद करा, अशी मागणी पुण्यातील रिक्षाचालकांनी केली होती. यासाठी अनेकदा रिक्षाचालकांनी बंद पुकारला होता. महाराष्ट्र रिक्षा पंचायत, पुणे रिक्षा फेडरेशनने न्यायालयात याबाबत बाजू मांडली होती. पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनीही मध्यस्थी करत या आंदोलनाता तात्पुरती स्थगिती दिली होती. मात्र त्यानंतरही रॅपिडो सुरु असल्याचं निदर्शनास आलं होतं. रिक्षाचालक पुन्हा आक्रमक झाल्याचे बघयला मिळालं होतं. दरम्यान, न्यायालयाच्या आदेशानंतर रिक्षा चालकांच्या मागणीला यश आले आहे.
या निर्णयाचे महाराष्ट्र रिक्षा पंचायतचे संस्थापक अध्यक्ष, कष्टकऱ्यांचे नेते बाबा कांबळे यांनी स्वागत केले आहे. पुणे रिक्षा फेडरेशनचे अध्यक्ष आनंद तांबे, राष्ट्रवादी रिक्षा संघटनेचे विजय ढवळे, सर्वसामान्य रिक्षा चालक आप्पा हिरेमठ, संतोष नेवासकर, सचिन रसाळ आधी रिक्षा चालक हे आज माझ्यासह मोठ्या संख्येने न्यायालयामध्ये उपस्थित होते. आम्ही आता रस्त्यावरची लढाई जिंकली. पुण्यामध्ये रिक्षा बंदसारखं मोठं आंदोलन झालं. आता न्यायालयात देखील आम्ही जिंकलो आहोत. हा रिक्षा चालक-मालकांचा विजय आहे. शेवटी न्याय मिळाला. आम्ही न्यायदेवतेचे आभार व्यक्त करतो, अशी प्रतिक्रिया बाबा कांबळे यांनी यावेळी दिली.