- वर्तुळाकार मार्गासाठी सहा किमी जागेचे भूसंपादन; मार्चमध्ये आराखड्याचे सादरीकरण…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० जानेवारी २०२३) :- पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) च्या वतीने टॉवन प्लॅनिंग (टीपी स्कीम)) राबविण्यात येणार आहे. सद्य:स्थितीत प्रस्तावित असलेल्या पाच टीपी स्कीमधून रिंग रोडची आखणी केलेली आहे. त्यामुळे त्यामधून पुणे जिल्ह्यातील वर्तुळाकार मार्ग (रिंग रोड) यासाठी सहा किमी जागेचे भूसंपादन होणार आहे.
पीएमआरडीएकडून सुरू असलेल्या नगररचना योजनांचे काम अंतिम टप्प्यात आहे, तर म्हाळुंगे-माण या टीपी स्कीमला राज्य सरकारची मंजुरी मिळाली आहे. त्यानंतर आता वडाची वाडी, औताडे हांडेवाडी, होळकरवाडी (एक), होळकरवाडी (दोन) आणि मांजरी कोलवडी या टीपी स्कीमवर काम सुरू आहे. या सर्व टीपी स्कीमसाठी जमीन अधिग्रहणाचे काम सुरु आहे. त्याबाबतचा आराखडा मार्च महिन्यामध्ये राज्य शासनाकडे सादर करण्यात येणार आहे. या टीपी स्कीममुळे रिंग रोडच्या भूसंपादनाला आधार मिळणार आहे. ज्या भागात टीपी स्कीम राबविण्यात येणार आहे त्या भागातून रिंग रोडची आखणी केली आहे.
सद्य:स्थितीत रिंग रोडच्या कामासाठीही जमिनीचे भूसंपादन करण्याचे मोठे आव्हान पीएमआरडीए प्रशासनासमोर आहे. त्यासाठी समृद्धी महामार्गाच्या धर्तीवर भूसंपादन करण्याचा मानस शासनाचा आहे. राज्य सरकारकडे सादर केल्या जाणाऱ्या या पाचही टीपी स्कीममधूनच या रिंग रोडची आखणी
झालेली आहे. त्यामुळे या टीपी स्कीमला मान्यता मिळाल्यानंतर रिंगरोडसाठी देखील जागा उपलब्ध होणार आहे. वडाची वाडी, औताडे हांडेवाडी, होळकरवाडी (एक) होळकरवाडी (दोन) आणि मांजरी कोलवडी या पाच स्कीममधून सहा किमी जागा उपलब्ध होणार आहे. या ठिकाणी भूसंपादनासाठी वेगळीप्रक्रिया राबविण्याची गरज नाही.
मंत्रिमंडळाने विविध प्रकल्पांसाठी भूसंपादन करण्यासाठी नुकसान भरपाई देण्यासाठी एमएसआरडीसी’ला ३५ हजार कोटी रुपयांहून अधिक कर्ज उभारण्याची परवानगी दिली. यामध्ये पुणे रिंगरोडसाठी ११ हजार कोटीची तरतूद आहे. त्याला राज्य सरकारने मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी दिली आहे. त्यामुळे भूसंपादन जलद होऊन रिंगरोडच्या प्रकल्पास एप्रिल महिन्यामध्ये सुरु होईल, असा दावा अधिकाऱ्यांनी केला आहे.
भूसंपादन प्रक्रियेमध्ये रस्ते पायाभूत सुविधांच्या प्रक्रियेत सर्वेक्षण आणि नुकसान भरपाईची घोषणा समाविष्ट आहे. रिंग रोड प्रकल्पासाठी ८३ पैकी ७२ गावांमध्ये ही प्रक्रिया सुरू झाली आहे. टीपी स्कीमचा उल्लेख हायटेक सिटी म्हणून केला जातो. गावामधील शेतक-यांच्या जमिनीवर आरक्षण टाकून त्याठिकाणी उद्याने, रुग्णालये, क्रीडा संकुल विकसित केले जाते. तसेच अंतर्गत रस्त्यांसह उड्डाणपूल, बायपास तयार केले जातात. त्यासोबतच वाढत्या लोकसंख्येसाठी पाणीपुरवठा, ड्रेनेज व्यवस्था तयार केली जाते. गावांचा कायापालट करून त्याठिकाणी हायटेक सिटी वसवली जाते.
पाच टीपी स्कीमच्या आराखड्याचे काम सुरु आहे. याचा आराखडा मार्च महिन्यामध्ये राज्य शासनाकडे सादर करण्यात येणार आहे. या स्कीममधून रिंग रोडसाठी सहा किमी जागा मिळणार आहे. त्यामुळे त्या कामालाही गती मिळणार आहे.
– रामदास जगताप, जनसंपर्क अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी पीएमआरडीए…