न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३१ जुलै २०२३) :- ज्ञानाई फाऊंडेशन, हेवन पार्क पोलिस वसाहत, पुणे येथे ज्ञानाई फाऊंडेशन संस्था आयोजित मैत्रीचा सातबारा या काव्यमैफिलाचा सोहळा संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ कविवर्य गझलकार बा.ह मगदूम ,मिरज प्रमुख पाहुणे ज्येष्ठ गझलकार मसूद पटेल,ज्येष्ठ कवियर्य चंद्रकांत जोगदंड निवेदक रानकवी जगदीप वनशिव,ज्ञानाई फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष लोककवी सीताराम नरके राष्ट्रपती पोलीस पदक मानकरी हे हजर होते.
कार्यक्रमाचे अध्यक्ष बा. ह .मगदूम सर मनोगतात म्हणाले ,”आई सारखे जगात दुसरे दैवत नाही, जात धर्म पंथ यांच्या पलिकडचा विचार मांडून विचारांशी सांगड शब्दबद्ध करत प्रत्येक साहित्यिकाची ती जबाबदारी आहे. काळानुसार पण कवितेचे विषय आशय असले तरच समाजात कवी हाच देशही बदलू शकतो.” परिवर्तनाचे तत्व जपत आईची महती त्यांनी कवितेतून व्यक्त केली. तसेच प्रमुख पाहुणे गझलकार मसूद पटेल यांनी आपली गझल सादर केली.
जीवनातील वास्तव दर्शन सांगणारी रचना सादर करून रसिकांच्या मनात घर करत बसणारी रचना टाळ्यांच्या गजरात या गझलेचे स्वागत केले. एक
बहुआयामी व्यक्तिमत्त्व हरहुन्नरी चतुरस्त्र मृदुल संयमी स्वभावाचे गुणी गझलकार म्हणून त्यांची महाराष्ट्रभर ख्याती आहे. कवी चंद्रकांत जोगदंड यांनी प्रीतीचे उधाण ही रचना सादर करून प्रेममय वातावरण केले. संस्थेचे अध्यक्ष लोककवी सीताराम नरके यांनी पावसाची खंत सादर केली.
रामदास शेळके, रामदास हिंगे, बबन धुमाळ , दिनेश गायकवाड, बाळासाहेब गिरी, काळूराम येळवंडे पाटील, विकास राऊत, जनाबापू पुणेकर, छगन वाकचौरे, रामचंद्र गुरव, सुवर्णा वाघमारे ,दिनेश कांबळे, प्रा दिलीप वाघमारे आदि कवींनी हजेरी लावली.
मैत्रीचा सातबारा तयार होतो तेव्हाच भविष्याचा उतारा मांडताना प्रेम अनाहूतपणे मांडणारे कवी कवियत्री नवरसात चिंबचिंब न्हावून निघाले. कवितेचा दर्जा संभाळत जीवनातील मैत्रीच्या अनुभवाचे धडे गिरवणारे कडू गोड भाष्य करत रचना सादर केल्या. रसिकांची मने जिंकली तसेच कविसंमेलनासाठी आलेल्या कवी,कवयित्रींना सन्मान पत्र ,सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.
या सुंदर काव्य सोहळ्याचे सूत्रसंचालन रानकवी जगदीप वनशिव यांनी आपल्या शीघ्रकाव्यातून रसाळ वाणीतून ओघावत्या शैलीत सूत्रसंचालन बहारदार केले.
ज्ञानाई फाऊंडेशन संस्था आयोजित मैत्रीचा सातबारा या २५ व्या काव्य मैफिलीचे आयोजन अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला त्यांच्या विचारांना नव्याने उजाळा देण्यासाठी करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे आभार डॉ चारूदत्त नरके यांनी मानले.











