- सायबर सेल तज्ञ नितेश बिचेवार यांचे आवाहन..
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० ऑगस्ट २०२३) :- समाजात सध्या सायबर गुन्हे मोठ्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढत आहे. यासाठी कमला शिक्षण संकुल संचलित प्रतिभा महाविद्यालयाने प्रतिभा फिनिशिंग स्कूल या स्वतंत्रपणे प्रशिक्षण देण्यासाठी विभाग स्थापन करून क्विक हिल फाऊंडेशनच्या वतीने सायबर शिक्षा व सायबर सुरक्षा उपक्रमाचे आयोजन करून तज्ञाकरवी सुमारे १५० विद्यार्थांना मार्गदर्शन व प्रशिक्षण देण्यात आले. तसेच सामंजस्य करार ही यावेळी करण्यात आला.
या विद्यार्थी प्रशिक्षण या समाजाभिमुख उपक्रमाचे उद्घाटन पिंपरी चिंचवड सायबर सेवेचे पोलीस अंमलदार नितेश बिचेवार व आशा सानप यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर क्विकहील फाऊंडेशनच्या अधिकारी मृणाल म्हापुसकर प्राचार्या डॉ. क्षितीजा गांधी, मुख्य प्रशासकीय अधिकारी डॉ. राजेंद्र कांकरिया, विभाग प्रमुख डॉ. जयश्री मुळे, डॉ. हर्षिता वाच्छानी, समन्वयिका प्रा. सुप्रिया गायकवाड आदी उपस्थित होते.
सायबर तज्ञ नितेश बिचेवार प्रशिक्षण व मार्गदर्शन करताना विद्यार्थाना पुढे म्हणाले, इंटरनेट, व्हॉटसअप, युट्युबमुळे माहितीजाळ खुले झाले असली तरी सततच्या मोबाईल हाताळल्यामुळे मुलांच्या व्यक्तीविकासावर, स्वभाव धारणेवर व कौटुंबिक संबंधावर विपरीत परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे. “लक्षात ठेवा चुकीचे काम कराल, तर भावी आदर्श आयुष्याला मुकाल, शिक्षण घ्यायला आला आहात तर जे जे आवश्यक आहे तेच घ्या. सुरक्षितता बाळगणे अत्यंत महत्वाचे असून फेसबुक प्रोफाइल लॉक करा, पासवर्ड तीन आकडी ठेवू नका, अनोळखी व्हिडीओ कॉल घेऊ नका, सोशल मिडीयावर सातत्याने दक्षता बाळगा” अडचण भासल्यास महाराष्ट्र सायबरचा कोर्स आहे, त्याची माहिती आत्मसात करा.
सायबर तज्ञ आशा सानप म्हणाल्या, ऑनलाईन शॉपिंग, शादी डॉटकॉम, नोकरी डॉटकॉम आदी आपली एक आभासी ओळख धारण करून सायबर विश्वास मुक्तसंचार करून अनेक फसवणुकीच्या तक्रारी पोलिसात दाखल आहेत. अॅप डाऊनलोड करताना खात्री करावी. क्रेडीट व डेबिट कार्डद्वारे व्यवहार करताना काळजी घ्यावी. आपला ओटीपी तिर्हाईताना शेयर करू नका, ऑनलाईन पेमेंटवरून फसवणूक होऊ शकते. आधारकार्ड, पॅनकार्डचे महत्व समजून घ्यावा.
मुख्य प्रशासकीय अधिकारी डॉ. राजेंद्र कांकरिया म्हणाले, येथील संस्थेत ७ हजार ५०० विद्यार्थी विविध शाखामधून शिक्षण घेत आहे. विद्यार्थ्यांना फसवले जाऊ नये, फसवणूक झाल्यास तात्काळ काय करावे, यासाठी महाविद्यालय व क्विक हील फाऊंडेशनमध्ये सामंजस्य करार करून विद्यार्थ्यांनी तज्ञकरवी प्रशिक्षण घेतल्यानंतर विविध नागरी भागात, महाविद्यालयात व्यक्तिश: जावून इतरामध्ये जनजागृती करणार आहे. पुस्तकी शिक्षणाबरोबर इतर समाजाभिमुख शिक्षण देण्याविषयी संस्थेचे संस्थापक सचिव डॉ. दीपक शहा यांचा वारंवार आग्रह असतो. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास कसा कराता येईल, यासाठी सतत पाठपुरावा त्यांच्याकडून केला जातो.
यावेळी प्राचार्या डॉ. क्षितीजा गांधी, क्विक हिल फॉऊंडेशनच्या अधिकारी मृणाल म्हापुसकर यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाची प्रस्तावना प्राचार्या डॉ. क्षितिजा गांधी यांनी केली सूत्रसंचालन प्रा. सुप्रिया गायकवाड यांनी तर; आभार विभाग प्रमुख डॉ. हर्षिता वाच्छानी मानले.















