- महाराष्ट्र मजदुर संघटनेच्या वतीने स्व.अण्णासाहेब पाटील यांना जयंतीनिमित्त अभिवादन…!
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. 26 सप्टेंबर 2023) :- आज खऱ्या अर्थाने स्व. अण्णासाहेब पाटील साहेबांच्या विचारांना प्रमाण मानून कष्टकरी, माथाडी, हमाल, मापडी कामगारांच्या हक्कासाठी कार्य करणारं सरकार महाराष्ट्रात प्रस्थापित झालं आहे. यंदाच्या पावसाळी अधिवेशनात या सरकारनं ‘महाराष्ट्र माथाडी हमाल व इतर श्रमजीवी कामगार अधिनियम १९६९’ या कायद्यात असणाऱ्या काही कालबाह्य तरतुदींमध्ये सुधार करण्याकरिता विधेयक विधिमंडळाच्या पटलावर ठेवले आहे. या विधेयकातील तरतुदींवर सर्वव्यापक चर्चा व्हावी, यासाठी राज्यातील माथाडी कामगार आणि संघटना यांच्याकडून ६ ऑक्टोबरपर्यंत सुचना मागविण्यात आल्या आहेत. कामगारांनी मोठ्या संख्येने त्यांना भेडसावणाऱ्या समस्या, अडी-अडचणी आणि त्यावरील योग्य सूचना या मुदतीत राज्य सरकारला पाठवाव्यात. जेणेकरून हा कायदा आणखी परिपूर्ण आणि लोकहितवादी बनु शकेल आणि तेच खरे माथाडी कामगारांचे दैवत स्व. अण्णासाहेब पाटील यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या स्मृतीला आणि विचारांना अभिवादन असेल, असे प्रतिपादन कामगार नेते तथा शिवसेना उपनेते इरफानभाई सय्यद यांनी केले.
कष्टकरी, गोरग़रीब जनतेला स्वाभिमानाने जगता यावे, यासाठी आपले आयुष्य वेचणारे स्व. अण्णासाहेब पाटील यांच्या जयंती निमित्त चिंचवड येथील अण्णासाहेब पाटील यांच्या पुतळ्याला मंगळवारी (दि. 26) रोजी महाराष्ट्र मजदूर संघटनेच्या वतीने पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले. त्यावेळी इरफानभाई सय्यद बोलत होते.
यावेळी कामगार नेते इरफानभाई सय्यद, परेश मोरे, प्रवीण जाधव, भिवाजी वाटेकर, पांडुरंग काळोखे, सर्जेराव कचरे, पांडुरंग कदम, सतीश कंठाळे,नागेश व्हणवटे, दादा कदम, समर्थ नाईकवाडे, अमित पासलकर, गोरक्षनाथ दुबाले, बबन काळे, संपत मांढरे, अशोक साळुंखे, ज्ञानेश्वर घनवट, गिरीश देशमुख,चंद्रकांत पिंगट, सोमनाथ फुगे, संदीप जांभळे,रोहित नवले, बालाजी खैरे,विकास साळुंखे,सुनील खोपडे ,राहुल मांडवे, विनोद जाधव,सोमनाथ देशमुख, निलेश चतुर, सचिन प्रचंड, संतोष पवार, नवनाथ नरळे, अमर सय्यद, अक्षय कदम, गणेश देवडकर, अतुल फरतडे, युवराज पोतेकर, सूरज भोसले, चंदन वाघमारे, रत्नाकर भोजने व असंख्य कामगार मोठ्या संख्यने उपस्थित होते.
अभिवादनप्रसंगी पुढे बोलताना इरफानभाई म्हणाले, पाटण तालुक्यातील मुंदुळ कोळे या गावी जन्मलेल्या अण्णासाहेबांनी कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी मुंबई गाठली. मुंबईत आल्यावर तेथे उसाच्या चरकावर आपल्या कष्टकरी जीवनाला प्रारंभ केला. दारुखाणा येथे ओझे उचलण्याची कामे केली. ही कामे करत असताना कामगारांना मिळणारा मोबदला, मालकाकडून होणारी पिळवणूक पाहून त्यांचे मन तळमळत असे. त्या तळमळीतून माथाडी कामगारांच्या न्याय हक्कासाठी लढा त्यांनी चालू केला. पुढे अनेक राजकीय नेत्यांकडे सरकार दरबारी पत्रव्यवहार पाठपुरावा करून माथाडी कायदा अमलात आणला. त्यामुळे माथाडी कामगारांना न्याय मिळून आज माथाडी संघटन हे एक बलाढ्य संघटन म्हणून नावारूपाला आले आहे. अण्णासाहेब पाटील यांनी गोरगरीब कष्टकरी माथाडी कामगारांकरिता केलेलं कार्य हे एका दीपस्तंभासारखच आहे. माथाडी कामगारांच्या कौटुंबिक, आर्थिक, सामाजिक जीवनात आमूलाग्र बदल होण्यासाठी स्व. अण्णासाहेब पाटील यांचे योगदान खूप मोठे आहे. स्व. अण्णासाहेब पाटील यांनी माथाडी कामगारांसाठी आणलेला माथाडी कायदा कामगारांनी अभ्यासाला पाहिजे. त्यांचे कार्य सदैव आमच्यासाठी प्रेरणादायी राहील.
”काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांमुळे माथाडी कामगार व कायदा बदनाम झाला आहे. गाव खेड्यातून आलेला आमचा माथाडी कामगार कधीही दादागिरी करीत नाही. प्रामाणिकपणे काम करुन श्रमाचा मोबदला मागतो. चुकीचे लोक माथाडीच्या नावाखाली कंपनी व्यवस्थापनाला व माथाडी कामगारांना वेठीस धरतात. पिंपरी- चिंचवड ही कामगारनगरी आहे. काही संघटनांच्या त्रासाला कंटाळून कंपन्या स्थलांतरित होत आहेत. हे थांबले पाहिजे. उद्योग टिकले तरच कामगार टिकेल”.
– मा. इरफानभाई सय्यद – महाराष्ट्र मजदूर संघटना, संस्थापक अध्यक्ष तथा शिवसेना उपनेते….