न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०२ नोव्हेंबर २०२३) :- सर्वांशी प्रेमपूर्ण व्यवहार केल्यास अवघ्या विश्वात शांतीमय वातावरण निर्माण होईल ‘‘सर्वांभूती परमात्म्याचे रूप पाहून प्रेमपूर्ण व्यवहार केल्यास विश्वात शांतीमय वातावरण निर्माण होईल’’ असे प्रतिपादन निरंकारी सदगुरु माता सुदीक्षाजी महाराज यांनी ७६ व्या वार्षिक निरंकारी संत समागमाच्या समापन सत्रामध्ये उपस्थित विशाल मानव परिवाराला संबोधित करताना व्यक्त केले.
शांती-अंतर्मनाची या मुख्य विषयावर आधारित हा तीन दिवसीय संत समागम निरंकारी आध्यात्मिक स्थळ समालखा (हरियाणा) येथे आयोजित करण्यात आला. ज्यामध्ये देशाच्या कानाकोपऱ्यातून तसेच जगभरातून लाखोंच्या संख्येने भाविक भक्तगण सहभागी झाले होते. पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्रातून या संत समागमामध्ये सुमारे २ लाख भाविक भक्तगण सहभागी झाले होते. ज्यामध्ये सुमारे २० हजार सेवादल स्वयंसेवकांचाही समावेश होता. दररोज सुमारे १० लाख भाविक या समागमामध्ये भाग घेत होते.
सद्गुरु माताजींनी सांगितले की, विश्वामध्ये जी प्राकृतिक व सांस्कृतिक स्वरुपातील बहुमुखी विभिन्नता आहे ती सुंदरतेचे प्रतीक आहे. वास्तविक या संपूर्ण सृष्टीचा निर्माता हा निराकार परमात्मा असून सर्वांभूती त्याचेच रूप सामावले आहे. या परम तत्वाचा बोध झाल्यानंतर सहजच आपण एकतेच्या धाग्यात गुंफले जातो आणि आपला दृष्टीकोन विशाल होतो.मग आपण संस्कृती,खाणे-पिणे इत्यादिंच्या कारणावरुन असलेले समस्त भेदभाव विसरुन सर्वांशी प्रेमपूर्ण व्यवहार करु लागतो.
समागमाच्या पहिल्या दिवशी बाल कवी दरबार तर दुसऱ्या दिवशी महिला कवि दरबार देखील आयोजित करण्यात आला होता. ज्याचा भक्तगणांनी भरपूर आनंद प्राप्त केला.