- राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची संतप्त प्रतिक्रिया…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ डिसेंबर २०२३) :- संसदेत घुसखोरी केल्याप्रकरणाची सखोल चर्चा व्हावी, या मागणीसाठी विरोधकांनी सभागृहात आवाज उठवला होता. मात्र सरकारने १४१ खासदारांचं निलंबन करत कार्यवाही केली आहे.
लोकसभेत मंगळवारी खासदार सुप्रिया सुळे आणि खासदार अमोल कोल्हे यांचं निलंबन करण्यात आलेलं आहे. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, संसदेमध्ये जो घुसखोरीचा प्रकार घडला तो अतिशय गंभीर होता. ज्या ठिकाणी खासदार बसतात तिथेच सुरक्षेचा प्रश्न निर्माण होत असेल तर चुकीचं आहे. घुसखोरांचा हेतू काय होता किंवा त्याबाबतची सविस्तर माहिती मिळावी, यासाठी खासादारांनी चर्चेची मागणी केली होती.
”चर्चा करण्याऐवजी विरोधी पक्षाच्या खासदारांना निलंबित करण्यात आलेलं आहे. संसदरत्न सन्मान मिळालेल्या सुप्रिया सुळे यांनाही निलंबित केलं आहे. आम्ही कधीच समोर जावून गोंधळ घालत नाही. तरीही असं निलंबन करणं म्हणजे सत्तेचा गैरवापर आहे.” अशा शब्दांत पवारांनी केंद्र सरकारला धारेवर धरलं.
दरम्यान, मंगळवारी विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घेरलं, त्यामुळे आणखी 49 खासदारांचं निलंबन लोकसभा अध्यक्षांकडून करण्यात आलं आहे. मंगळवारी निलंबित झालेल्या खासदारांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) खासदार सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे यांचाही समावेश आहे. लोकसभा आणि राज्यसभा अशा दोन्ही सभागृहातून आतापर्यंत 141 खासदारांचं निलंबन करण्यात आलं आहे.