- पाच किलोमीटरच्या मार्गावर तब्बल २८ गतिरोधक..
- वाहनचालकांची सत्वपरीक्षा अजून किती दिवस?…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
देहू वार्ताहर (दि. १५ जानेवारी २०२४) :- रस्त्यावर एखादा मोठा गतिरोधक अथवा खड्डा असला तरी वाहन चालक हैराण होतात. मात्र, देहूरोड ते देहूगाव या पाच किलोमीटरच्या मार्गावर तब्बल २८ गतिरोधक पार करून जावे लागत आहे. हे कमी म्हणून की काय खड्डेही मोठ्या प्रमाणात आहेत. गतिरोधक व खड्ड्यांमुळे वाहन चालक हैराण झाले असून, गतिरोधकांची संख्या कमी करण्याची मागणी होत आहे.
या मार्गावर देहूरोडपासून माळवाडीपर्यंत लष्कराची तर माळवाडीपासून देहूपर्यंत नगरपंचायतीची हद्द आहे. देहू तीर्थक्षेत्र असल्याने येथे येणाऱ्या भाविकांची संख्या अधिक असते. तसेच चाकण एमआयडीसी, तळवडे आयटी पार्क, शाळा, महाविद्यालये असल्याने देहूच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांची संख्या अधिक असते. तसेच निगडी, पिंपरी-चिंचवड पुणे, मुंबई या भागाकडे जाण्यासाठी देहूरोडच्या दिशेने येणाऱ्या नागरिकांच्या वाहनांची संख्याही अधिक असते. मात्र, या मार्गावर जागोजागी गतिरोधक उभारलेले आहेत. यातील गतिरोधकाची उंची कमी-जास्त असून, यावर वाहने आदळल्याने अपघाताच्या घटना घडत आहेत. तसेच वाहनांचा वेग अधिकच मंदावत असून, यामुळे वाहनांच्या दूरपर्यंत रांगा लागतात.
या मार्गावरील अनेक ठिकाणचे पथदिवे बंद असल्याने तसेच गतिरोधकावर सफेद पट्टेही नसल्याने हे गतिरोधक रात्रीच्या अंधारात दिसून येत नाहीत. समोर गतिरोधक असल्याचे लक्षात येत नसल्याने त्यावर वाहन आदळून अपघाताच्या घटना घडत आहेत.
गतिरोधकांची संख्या कमी म्हणून की काय, त्यात आणखी खड्ड्यांचीही भर पडली आहे. शनी मंदिर परिसर, चिंचोली बसथांबा तसेच कमानीजवळील रस्ता या परिसरात मोठ-मोठे खड्डे पडले आहेत. देहूहून निगडीला जाण्यासाठी तळवडे मार्गेही रस्ता आहे. मात्र, या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असते. त्यामुळे अनेकजण देहूरोडमार्गे जातात. देहूरोड ते निगडी हा रस्ताही उत्तम झाला आहे. मात्र, देहू ते देहूरोड या पाच किलो मीटरवरील गतिरोधकांमुळे वाहन चालक हैराण होतात.
आवश्यकता नसतानाही अनेक ठिकाणी गतिरोधक उभारलेले आहेत. ते नियमानुसारही नाहीत. थोड्या-थोड्या अंतरावर हे गतिरोधक उभारलेले असल्याने वाहतूक मंदावते. अपघाताच्या घटनाही घडतात. येथील गतिरोधकांची संख्या कमी करणे गरजेचे आहे.
-कैलास पानसरे, सदस्य, कॅंटोन्मेंट बोर्ड, देहूरोड….