न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०५ फेब्रुवारी २०२४) :- राष्ट्र प्रथम या संकल्पनेतून भारत विश्वगुरू होऊ शकतो” असे प्रतिपादन ज्येष्ठ प्रवचनकार डॉ. संजय उपाध्ये यांनी चिंचवडगाव येथे रविवारी केले. गांधीपेठ तालीम मित्रमंडळ आयोजित ‘मन करा रे प्रसन्न’ या प्रवचन मालिकेंतर्गत ‘विश्वगुरू भारत’ या विषयावर निरूपण करताना डॉ. संजय उपाध्ये बोलत होते.
यावेळी ह. भ. प. किसनमहाराज चौधरी, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मधू जोशी, रविकांत कळंबकर, गांधीपेठ तालीम मित्रमंडळाचे अध्यक्ष राजाभाऊ गोलांडे यांच्यासह विविध क्षेत्रातील अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.
डॉ. संजय उपाध्ये पुढे म्हणाले की, भारताला विश्वगुरू बनविण्यासाठी नेत्यापेक्षाही जनतेचा सहभाग जास्त महत्त्वाचा आहे. लोकशाहीमध्ये ‘यथा प्रजा तथा राजा’ हे तत्त्व मूलभूत असते. त्यामुळे देशाला विश्वगुरू बनविण्यासाठी नागरिकांना स्वतःमध्ये कणाकणाने बदल करावे लागतील. विश्वगुरू होण्याची प्रक्रिया व्यक्ती, कुटुंब, समाज, राष्ट्र या क्रमाने कार्यान्वित होत असते. त्यामुळे आपले आचरण विश्वनागरिकासारखे असायला हवे. धर्मकारण, अर्थकारण, समाजकारण, राजकारण करताना दातृत्व, राष्ट्रवाद, शिष्टाचार, विजिगीषूवृत्ती या गुणांचा अंगीकार करावा लागेल.
महेश गावडे, सुभाष चव्हाण, बंडू भोकरे, संदीप जंगम, गोपी बाफना, प्रदीप गांधलीकर यांनी संयोजनात सहकार्य केले. सुहास पोफळे यांनी सूत्रसंचालन केले आणि आभार मानले.