- राष्ट्रवादी प्रवेशाबाबत केली स्पष्टता…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०८ मार्च २०२४) :- शिरूर लोकसभा निवडणुकीत मला तिकीट द्यावे, अशी मागणी आपण अजूनही केलेली नाही; तसेच जाहीरही केलेले नाही. पक्षप्रमुख ठरवतील तो निर्णय मान्य असेल असे सांगत शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी उमेदवारीवरून एक पाऊल मागे घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.
‘म्हाडा’चे अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर आढळराव पाटील यांना उमेदवारी मिळणार नाही, या शक्यतेला बळ मिळाले आहे. राष्ट्रवादीकडून ऑफर आल्यास स्वीकारणार काय?, याविषयी पक्षप्रमुख ठरवतील असे सांगून त्यांनी वेळ मारून नेली.
महायुतीच्या जागावाटपात शिरूर लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादीकडे जाईल, याची चर्चा आता जोर धरू लागली आहे. गेल्यावेळच्या निवडणुकीत पराभूत झालेले शिवसेनेचे शिवाजीराव आढळराव पाटील निवडणूक लढवण्यासाठी आग्रही होते; मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आग्रहास्तव त्यांनी ‘म्हाडा’च्या पुणे मंडळाचे अध्यक्षपद स्वीकारले. यानंतर त्यांचा उमेदवारीचा पत्ता कट झाल्याचे बोलले जात होते. आढळराव यांनी मात्र, याचा स्पष्ट शब्दांत इन्कार केला होता. गेली पाच वर्षे मी मतदारसंघात फिरत असून, ही निवडणूक लढवावी, असा कार्यकर्त्यांचा आग्रह आहे. त्यामुळे ही निवडणूक लढवणारच यावर ते ठाम होते; मात्र जागावाटपाची चर्चा रेंगाळल्याने; तसेच हा मतदारसंघ राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाकडे जाण्याची शक्यता बळावल्याने आढळराव यांनी उमेदवारीवरून माघार घेतल्याचे दिसून येत आहे. तसेच मी राष्ट्रवादीकडे उमेदवारीसाठी जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.