न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ मार्च २०२४) :- आज नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. दुष्काळ हटवण्यासाठी सरकार प्रयत्न करेलच मात्र आम्हीही नाम फाऊंडेशन म्हणून शक्य तितके सगळे प्रयत्न करु असं मकरंद अनासपुरे यांनी म्हटलं आहे.
यानंतर नाना पाटेकरांना विचारणा करण्यात आली की तुम्ही शिरुरमधून निवडणूक लढवणार का? त्यावर आता त्यांनी उत्तर दिलं आहे. मला फक्त तुम्ही कळवा मी कुठून निवडणूक लढवणार आहे ते. मी खूप ठिकाणांहून निवडणूक लढवणार अशा चर्चा ऐकतो. एकदा मला सांगा की मी कुठून निवडणूक लढवणार” असं नाना पाटेकर मिश्किलपणे म्हणाले.”
“राजकारण हा माझा प्रांत नाही. कारण तिथे गेलो तर आत्ता जे काम करतो आहे ते काम करण्यात जे समाधान आहे ते मला मिळणार नाही. मनात आलेलं सगळं आपण बोलू देतील माहीत नाही. तसंच किती राहू देतील ते पण माहीत नाही. त्यामुळे आम्ही नामच्या माध्यमातून लोकांच्या संपर्कात आहोत. गुवाहाटी, उत्तर प्रदेश या राज्यांमध्येही आम्ही ही मोहीम घेऊन जात आहोत” असंही नाना पाटेकर यांनी म्हटलं आहे.
आपण आपल्यासाठी जगत असतोच, पण लोकांसाठी आपण हे काम करत राहू असंही नाना पाटेकर म्हणाले. मागच्या ८ वर्षात नाम फाऊंडेशनने ६५९ गावांत पाणी पोहचवण्याचं काम केलं असं मकरंद अनासपुरे यांनी म्हटलं आहे.
—


















