न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ एप्रिल २०२४) :- मावळ तालुक्याच्या पूर्व भागातील जाधववाडी धरणामध्ये ४४ टक्के पाणीसाठा असून या पाण्याचे जूनमधील संत तुकाराम महाराज पालखी प्रस्थान सोहळ्यापर्यंतचे नियोजन करण्यात आले आहे.
जाधववाडी धरणातून नवलाख उंब्रे परिसर, जांबवडे, सुदुंबरे, सुदवडी, इंदोरी अशा देहूपर्यंतच्या ग्रामपंचायतींना पिण्यासाठी व शेतीला पाणीपुरवठा केला जातो. गावांच्या मागणीनुसार, साधारणपणे दर महिन्यात सुमारे दहा दिवस धरणातून पाणी सोडले जाते. धरणातील उपयुक्त पाणीसाठा ०.३६ टीएमसी इतका असून सध्या धरणात ४४ टक्के (०.१५ टीएमसी) पाणीसाठा आहे. गेल्या वर्षी धरणात ४७ टक्के (०.१६ टीएमसी) पाणीसाठा होता.
जाधववाडी धरणाचे शाखाधिकारी किशोर चव्हाण म्हणाले,‘‘कडक उन्हाळा व पाण्याच्या वाढत्या मागणीमुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा धरणात कमी पाणीसाठा आहे. मात्र, जून महिन्यातील देहू येथील संत तुकाराम महाराज पालखी प्रस्थान सोहळ्यापर्यंत पुरेसा पाणीसाठा राहील, अशा पद्धतीने पाण्याचे नियोजन करण्यात आले आहे.’’