- पवारांनी कान धरून सोसायटीधारकांची मागितली माफी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०२ मे २०२४) :- आयटीनगरीतील सोसायटी धारकांनी उपमुख्यमंत्री अजित यांच्यासमोर अक्षरशः समस्यांचा पाढाच वाचला. येथील गंभीर स्वरूपाच्या समस्या ऐकून अजित पवार अवाक् झाले, तर मोठ्या प्रमाणावर कर भरूनसुद्धा आपणास अनेक वर्षांपासून मूलभूत समस्यांचा सामना करावा लागत असल्याने पवार यांनी कान धरून सोसायटीधारकांची माफी मागितली.
शनिवार (दि. २७) रोजी सायंकाळी मारुंजी रस्त्यावर असलेल्या एका हॉलमध्ये आयटीतील सर्व सोसायटीधारक पदाधिकारी आणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची एक बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी हिंजवडी, माण, मारुंजी, जांबे आणि नेरे परीसरातील अनेक उच्चभ्रू सोसायट्यामधील सदस्य आणि पदाधिकारी मोठ्या संख्यने उपस्थित होते.
यावेळी समस्या मांडताना सोसायटीधारकांनी ग्रामपंचायतच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आपल्या भावना बैठकीत व्यक्त केल्या. पिण्याचे पाणी, खराब रस्ते, वाहतूक कोंडी, कचरा, पर्यावरण, नदी प्रदूषण, रस्ता आणि पदपथावर झालेले अतिक्रमण, विजेचा प्रश्न, कायदा सुव्यवस्था, सार्वजनिक वाहतूक तसेच उद्यान आणि खेळाची मैदाने, नागरी सुविधा केंद्र यासारख्या मूलभूत समस्या मांडल्या. प्रतिवर्षी लाखो रुपये इन्कम टॅक्स त्याचबरोबर स्थानिक ग्रामपंचायतचे कर भरूनसुद्धा आमच्या पदरी फक्त समस्याच पडत असल्याच्या संतप्त भावना सोसायटीधारकांनी बैठकीत व्यक्त केल्या.
दरम्यान, आयटी परिसरात एवढी विदारक स्थिती असल्याने, यापूर्वीच्या लोकप्रतिनिधींनी आजपर्यंत नक्की काय केले, असा प्रश्न अजित पवार यांनी उपस्थित केला, तर सोसायटीधारकांच्या समस्या मार्गी लावण्याचा प्रयत्न करून, आयटी परिसरात ठोस धोरणात्मक उपाययोजना करणार अशी ग्वाही अजित पवार यांनी उपस्थित सोसायटीधारकांना दिली.
अजित पवार यांची काम करण्याची पद्धत आम्हाला माहीत आहे. त्यांची प्रशासनावर चांगली पकड आहे. त्यामुळे, आमच्या समस्या अजित दादा नक्की सोडवतील, असा आशावाद सोसायटीधारकांनी बैठक संपल्यावर व्यक्त केला. बैठकीस उच्चभ्रू सोसायटीधारकांचा प्रतिसाद पाहायला मिळाला. अनेकांनी लेखी निवेदने देत, आमच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करा, अशी विनंती पवार यांना केली. त्यास अजित दादांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.