- शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांची माहिती…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ फेब्रुवारी २०२१) :- ‘राज्यातील काही जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. ही परिस्थिती पाहता स्थानिक प्रशासनाने जिल्ह्यातील स्थितीनुसार येत्या सोमवारपासून म्हणजेच १ मार्चपासून आवश्यकता भासल्यास आणि परिस्थिती नियंत्रणात येईपर्यंत काही काळ शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घ्यावा,” असा आदेश शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी गुरूवारी दिला आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढू लागल्याने मुंबई, पुणे यांसह अनेक शहरांमधील शाळा सध्या बंद आहेत. त्या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षण विभाग आणि अन्य अधिकाऱ्यांच्या उच्च पातळीवर वारंवार बैठका होत आहेत.दरम्यान १ मार्चपासून शाळा बंद ठेवण्याच्या निर्णय घेण्याची जबाबदारी गायकवाड यांनी स्थानिक प्रशासनावर सोपवली आहे.
त्या म्हणाल्या,”विद्यार्थी आणि शिक्षक यांची सुरक्षितता याला सर्वोच्च प्राधान्य आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव आढळून आलेल्या शाळांमध्ये आवश्यक ती स्वच्छता व निर्जंतुकीकरण करण्याची कार्यवाही करण्याबाबत स्थानिक प्रशासनास सुचना देण्यात आल्या आहेत. काही जिल्ह्यातील शाळांमध्ये विद्यार्थी व शिक्षकांत कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता समाजकल्याण मंत्री, आदिवासी विकास मंत्री यांच्याशी चर्चा करण्यात येत आहे.” याबाबत राज्यातील सर्व जिल्ह्यांच्या शिक्षणाधिकारी यांच्याकडून जिल्हानिहाय आढावा घेण्यात येत असल्याचेही गायकवाड यांनी ‘ट्विटर’द्वारे माहिती दिली आहे.