- पं. दीनदयाल उपाध्याय हिंदी विद्यापीठाकडून “विद्यावाचस्पती” पदवी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ एप्रिल २०२४) :- पिंपरी चिंचवड शहर तसेच राज्यात विविध सामाजिक विषयांसाठी कार्यरत असणारे प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीचे राज्य अध्यक्ष तसेच सामाजिक कार्यकर्ते, पर्यावरण अभ्यासक विजयकुमार पाटील यांना उत्तर प्रदेश वृंदावनधाम मथुरा स्थित नामांकित पंडित दीनदयाल हिंदी विद्यापीठाकडून विद्यावाचस्पती सारस्वत (डॉक्टरेट) पदवी बुधवारी (दि. २४) रोजी भोपाळ स्थित विद्यापीठाच्या कार्यक्रमात प्रदान करण्यात आली.
याप्रसंगी प्रमुख उपस्थिती मध्य प्रदेश शासनाचे सेवानिवृत्त जिल्हा न्यायाधिश देवेंद्रकुमार जैन यांची होती. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. इंदुभूषण मिश्रा “देवेन्दू” हे समारंभाच्या अध्यक्षस्थानी होते. प्रमुख अतिथी म्हणून मध्य प्रदेश शासनातील लोक शिक्षण संचनालय अप्पर निदेशक पंडित धिरेंद्र चतुर्वेदी(सेवानिवृत्त), मध्य प्रदेश मुख्यमंत्री उदय योजनेचे तांत्रिक शिक्षा विभागाचे प्रभारी विष्णुकांत कनकने, दुर्ग येथून आलेले पर्यावरण तज्ञ तसेच पं. दीनदयाल विद्यापीठाचे ब्रँड अँम्बेसिडर डॉ.विश्वनाथ पाणिग्रही हे उपस्थित होते.
या प्रसंगी कुलगुरू डॉ.मिश्रा म्हणाले.” देशातील विविध क्षेत्रात म्हणजेच हिंदी भाषा लेखन,पर्यावरण जागरूकता, चिकित्सा सेवा, जल संरक्षण, विधी सहायता, नागरी सुरक्षा, तसेच सामाजिक सेवा क्षेत्रात केलेल्या विशेष व उल्लेखनीय योगदानाबद्दल आज हा पदवीदान समारंभ होत आहे.देशातील विद्वान अश्या ह्या सर्व पदवी प्राप्त निवड झालेल्या सन्मानित सदस्यांचे अभिनंदन.हया सर्वांनी राष्ट्र भाषेच्या प्रसारहेतु तसेच समाजसेवेसाठी असेच कार्यरत रहावे.
देशातील विविध प्रांतातून आलेल्या उपस्थितांकडून संस्थच्या ब्रँड अँबेसिडर डॉ.विश्वनाथ पाणिग्रही यांनी केंद्र शासनाच्या मतदाता जागरूकता अभियानाच्या अंतर्गत शत प्रतिशत मतदानासाठी शपथ घेतली. विद्यापीठाच्या वतीने देशातील विविध भागातील निवड झालेल्या गणमान्य व्यक्तींचा पदवी देऊन सन्मान करण्यात आला.त्याचप्रमाणे विद्यापीठ समारंभ समितीकडून उपस्थित प्रमुख पाहुण्यांचा स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. महाराष्ट्र राज्यातील पुणे स्थित विजयकुमार पाटील यांना भाषा लेखन तसेच २५ वर्षाच्या सामाजिक क्षेत्रातील योगदानाबद्दल डॉक्टरेट (पीएचडी) पदवी देऊन सन्मानित करण्यात आले. ह्या दिमाखदार सोहळ्याचे सूत्रसंचालन आचार्य पंडित जानकी वल्लभ शास्त्री यांनी केले. आभार प्रदर्शन संजय शर्मा तसेच डॉ प्रकाश सर यांनी केले.