- ऐन हिवाळ्यात झाडाला लागल्या कैऱ्या
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
चिंचवड (दि. २४ डिसें.) :- निसर्ग नियमानुसार आंब्याचा मोहर वसंत ऋतूत येतो व होळीच्या सणानंतरच आंब्याच्या कैऱ्या पहावयास मिळतात. बदलत्या हवामानामुळे पिंपरी चिंचवडच्या नैसर्गिक वृक्ष वाढीच्या चक्रामध्ये बदल पहावयास मिळत आहे. या संदर्भात प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीच्या पर्यावरण विभागाचा एक अभ्यास गट त्यामध्ये विजय मुनोत, अर्चना घाळी, संतोष चव्हाण, विजय जगताप, सतीश देशमुख, जयेंद्र मकवाना, विशाल शेवाळे, अमोल कानु, अजय घाडी, नितीन मांडवे तसेच समिती अध्यक्ष विजय पाटील हे “आपल्या शहरातील हिवाळी वृक्ष संपदा” ह्या विषयासंदर्भात निरीक्षण करीत आहेत. हे परीक्षण करीत असताना सदरचे आंब्याचे झाड निदर्शनास आले.
तसे पाहिले तर हिवाळ्यामध्ये ते पण डिसेंबर महिन्यामध्ये महाराष्ट्रातील भौगोलिक परिस्थिती व हवामानाचा विचार केला असता, ही फारच विरळी घटना आहे. या अगोदर ह्याच वर्षी ऑक्टोबर महिन्यात दिवाळीच्या सुमारास नांदेड येथील हिमायतनगर येथील टेंभी रस्त्यावर साईबाबा मंदिराजवळील आंब्याच्या झाडाला कैऱ्या लागल्याची नोंद आहे. त्याचप्रमाणे नोव्हेंबर महिन्यात नाशिक-येवला येथील राजापूर मधील शेतकऱ्याच्या झाडाला हिवाळ्यात म्हणजेच नोव्हेंबर महिन्यात कैऱ्या लागल्याचा उल्लेख आढळतो. परंतु, डिसेंबर महिन्यामध्ये कोठेही कैऱ्या लागल्याचा संदर्भ आढळून येत नाही. या सगळ्यामध्ये आपल्या पिंपरी चिंचवड शहराने आश्चर्यकारक घटनेची नोंद केली आहे.
याबाबत पर्यावरण अभ्यासक प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीचे अध्यक्ष विजय पाटील म्हणाले, “जुन्या पिढीतील शेतकरी तसेच जाणत्या बुजुर्गांच्या माहितीनुसार असे घडणे धोक्याची घंटा असू शकते. अश्याप्रकारे उशिरा अवेळी येणाऱ्या फळांचे लक्षण म्हणजे महाराष्ट्रात पुढील काळात दुष्काळ पडण्याचे संकेत असू शकतात. नाशिक, नांदेड तसेच पिंपरी चिंचवड शहरातील हिवाळी आंब्याचे दर्शन म्हणजे वातावरण बदलाचे संकेतच आहेत. हरित पट्टा कमी झाल्यामुळे पिंपरी चिंचवडच्या पर्यावरणाचा समतोल बिघडत चालला आहे. वाढत्या शहरीकरणाचा तसेच विकासकामांचा फटका वृक्षांना बसत आहे. वृक्ष लागवड मोठ्या संख्येने शहरात करणे आवश्यक आहे. निसर्गाने दिलेल्या संकेतांकडे आपण दुर्लक्ष करता कामा नये.”