- भटक्या विमुक्त जमातींच्या विकासासाठी राष्ट्रवादी कटिबध्द- हिरालाल राठोड…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ ऑगस्ट २०२१) :- दीन-दुबळे घटक वंचित राहू नये, यासाठी राष्ट्रवादीच्या माध्यमातून विमुक्त जाती भटक्या जमाती सेलच्या माध्यमातून त्याचे प्रश्न सोडविण्याचे काम चालू आहे. भटक्या विमुक्त जमातींना विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी राष्ट्रवादी कटिबध्द आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे भटक्या व विमुक्त सेलचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तथा माजी आमदार हिरालाल राठोड यांनी केले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भटक्या विमुक्त जमाती सेल प्रदेशाध्यक्ष हिरालाल राठोड यांच्या उपस्थितीत शनिवारी दिनांक १४ ऑगस्ट २०२१ रोजी खराळवाडी पक्ष कार्यालयात सेलची बैठक पार पडली. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या सरचिटणीस शकुंतला भाट, भटक्या विमुक्त जमाती सेलचे शहराध्यक्ष धीरज तामचीकर, उपाध्यक्ष सुमित लाड, महिला शहराध्यक्ष निर्मला माने, सेवादल शहराध्यक्ष महेश झपके, विजय जाधव, गुलामअली भालदार यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
मार्गदर्शन करताना हिरालाल राठोड पुढे म्हणाले की, आरएसएससारख्या संघटनेच्या विचारसरणीचे माणसं महाराष्ट्राला चालू देत नाहीत, पंरतु समाजातील दीन-दुबळे घटक विकासापासून वंचित राहणार नाहीत. यासाठी शरद पवार साहेब सातत्याने मार्गदर्शन करत असतात. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सर्व समाजाला पुढे घेऊन जाण्यासाठी प्रयत्नशील आहे. भटक्या विमुक्त समाजासाठी विकास आऱाखडा तयार करण्यासाठी पक्षाच्या माध्यमातून पाठपुरावा करत आहोत. भटक्या विमुक्त जाती जमातींना योग्य प्रमाणात आरक्षण मिळावं. या साठी आदिवासींमध्ये वर्गीकरण केले जावे. तांडा वस्ती योजनेला अर्थसहाय्य केले जावे. याबरोबर वसंतराव नाईक विकास महामंडळ स्थापन केले जावे. या महामंडळाच्या माध्यमातून एक हजार कोटी रुपयांची तरतूद केली जावी. ही मागणी सातत्याने करत आहोत.
संजोग वाघेरे पाटील म्हणाले, भटक्या विमुक्त जाती जमातींचे विविध प्रश्न आणि समस्या सोडविण्यासाठी शहर पातळीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून प्रयत्न केला जातो. आगामी महापालिका निवडणुकीसाठी पक्षाची ताकद वाढविण्यासाठी, तसेच तळागाळातील समाजाचे प्रश्न सुटले पाहिजेत. या करिता विविध शहर पातळीवर भटका विमुक्त जाती जमाती सेलच्या प्रभाग अध्यक्षांपासून बुथ कमिट्या याची रचना करण्याची भूमिका देखील संजोग वाघेरे यांनी मांडली.